रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे आज पुण्यस्मरण. वयाच्या 23 व्या वर्षी रणांगणात हौतात्म्य पत्करून विजेच्या लखलखाटाप्रमाणे त्यांचे आयुष्य चमकून गेले. राणीसाहेबांचे माहेरचे तांबेकुटुंब मूळचे लांजा तालुक्यातील कोलधे येथील. त्यानंतर त्यांचे पूर्वज साताऱ्याजवळील धावडशी (ब्रह्मेंद्रस्वामी यांचे समाधीस्थान) येथे आले. त्यानंतर ते दुसरे बाजीराव यांच्याबरोबर बिठूर येथे गेले. त्यांचा जन्म वाराणसी येथे वर्ष 1835 मध्ये झाला. त्यांचे नाव मनिकर्णिका असे ठेवण्यात आले. त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी वर्ष 1842 मध्ये वयाच्या 7व्या वर्षी झाला. नेवाळकर कुटुंबही लांजाजवळील तालुक्यातील कोट या गावाचे ते गावही राणीच्या माहेरगावा जवळच आहे.
लहानपणीच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. त्यांना लहानपणी मनू या नावानेच संबोधले जायचे. त्यांना एक मुलगाही झाला होता; पण तो अल्पजीवी ठरला. त्यानंतर गंगाधररावांनी त्याच्या पुतण्याला दत्तक घेतले. गंगाधररावांचा वर्ष 1853 मध्ये मृत्यू झाला. 13 मार्च, 1854 रोजी इंग्रज सरकारने दत्तक विधान नामंजूर केले व झाशीसंस्थान व भारतातील अनेक संस्थाने खालसा केली. या विरुद्ध संस्थानिकांनी उठाव केला, पण बुंदेलखंड, अवध भागातील संस्थानिक व दिल्ली, झाशी व बिठूरचे नानासाहेब पेशवा यांच्याखेरीज भारतातील इतर कोणत्याही संस्थानातून यास पाठिंबा मिळाला नाही. झाशीजवळील ओर्च्छा संस्थानही राणीच्या विरोधात गेले.
1857 च्या स्वातंत्र्य उठावातील त्या अग्रणी सेनानी होत्या. हा उठाव जरी फसला तरी भारतातील क्रांतिकारकांना तो स्फूर्तिदायी ठरला. उठाव झाल्यावर 5 जून, 1857 रोजी झाशीतून इंग्रजांना पळवून लावले व राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. रिकामा खजिना व अपुरे सैन्यबळ असतानाही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांच्यावर काही कामगिरी सोपविली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना-मोरोपंत तांब्यांना-खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांच्या सहाय्याने फौज उभी केली. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले व राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले.
वर्षभरातच 21 मार्च 1858 ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघातामुळे, अन्यायामुळे भारतात ब्रिटिश शासन नकोच, अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली.
फितुरी आणि इंग्रजांच्या बलाढ्य सेनेपुढे राणीसाहेबांना झाशी सोडणे भाग पडले. ग्वाल्हेरच्या दिशेने त्या गेल्या; पण घनघोर लढाई होऊन त्यात त्यांना हौतात्म्य आले. त्यांच्या साथीदारांनी त्यांचे शव इंग्रजांच्या हाती लागू न देता त्यावर अंत्यसंस्कार केले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.
– माधव विद्वांस