-हिमांशू
करोनानंतरचं जग पूर्णपणे बदललेलं असेल, असं सांगण्याचे दिवस कदाचित संपले असावेत किंवा सांगणाऱ्यांना वस्तुस्थितीचं भान आलं असावं. आता आपण एका बदललेल्या जगात प्रवेश करणार आहोत, असा आभास लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला वारंवार होत होता. चर्चाही तशाच रंगल्या होत्या; पण चर्चा करणारे हळूहळू ढेपाळले. याची दोन महत्त्वाची कारणं सांगता येतील. एकतर कुठलाही बदल “आपोआप’ कधीच घडत नसतो याचा अंदाज दावे करणाऱ्यांना नव्हता. दुसरं कारण असं की, “बदल स्वीकारणारेच मोठे होतात,’ असा सुविचार वारंवार सांगितला जात असला, तरी हा स्वीकार फारच कमी लोकांना जमतो.
मुख्य म्हणजे, आपल्या संपूर्ण जीवनातच जे मूलगामी बदल होतील, असं सांगितलं जात होतं त्यासाठी मुळात आपल्या अंतरंगात बदल होणं अपेक्षित आहे आणि ते शक्य नाही, हे हळूहळू दिसायला लागलंय. करोनाच्या महामारीनं सगळे नियम बदलून टाकले; पण मानसिकता कशी बदलणार? प्रचंड वेगाची सवय लागलेल्या जगाला या दिवसांनी ब्रेक लावून दाखवला. सगळं काही जागच्या जागी ठप्प झालं. माणसांना कुटुंबात गुंतवून टाकलं या दिवसांनी. कदाचित कुटुंबाची किंमत लोकांना कळेल आणि माणसाला माणूस बनण्याची संधी मिळेल, असं वाटलं होतं. पण माणसाला बदलण्यात कधीच रस नव्हता आणि यापुढेही नसेल, हे आता ठिकठिकाणी ठळकपणे दिसून येऊ लागलंय.
अर्थव्यवस्थेचे जसे काही “कोअर सेक्टर’ असतात, तसे बदलांची सूचना देणारी काही महत्त्वाची क्षेत्रं असतात. त्यातल्या त्यात राजकारण आणि चित्रपट या क्षेत्रांमध्ये समाजमनाचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसतं; किंवा समाजमनावर या क्षेत्रांचा जबरदस्त पगडा दिसतो. या दोन्ही क्षेत्रांमधल्या सध्याच्या घडामोडी पाहिल्या असता, आपण एका मोठ्या, अनोळखी आणि जीवघेण्या महामारीचा मुकाबला करीत आहोत, याची यत्किंचित आठवण राहात नाही. चित्रपटसृष्टीत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून जे काही सध्या सुरू आहे, ते करोनाच्या जागतिक संकटाचा विसर पडण्यासाठी पुरेसं आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीमुळे उत्तरोत्तर हे प्रकरण अधिकाधिक चर्चेत येईल, याची खात्री सर्वांनाच आहे. दुसरीकडे, जो विषाणू जगात कुणालाच समजलेला नाही, त्याच्या व्यवस्थापनासाठी एकमेकांना सहकार्य करणं विसरून राजकीय व्यक्तींनी एकमेकांवर चिखलफेक करण्याचा शिरस्ता कायम राखलाय, हे अत्यंत अभिनंदनीय आहे. केंद्रात आणि राज्यात जे सध्या विरोधी पक्षात आहेत, ते सत्तेत असते तर कोविडचा एवढा प्रकोप झालाच नसता, असं वातावरण निर्माण केलं जातंय. दोन्ही ठिकाणचे सत्ताधारी वेगवेगळे आहेत, हेच जनतेचं सुदैव! या साऱ्या गोष्टी आपण माणूस असल्याच्या दाव्यापुढे प्रश्नचिन्ह लावणाऱ्या आहेत आणि त्या प्रातिनिधिकसुद्धा आहेत.
सेलिब्रिटी आणि राजकारणी जर अशा परिस्थितीत बदलू शकत नसतील आणि कोणतेही कारण पुढे करून व्यक्तिगत अजेंडा रेटण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतील, तर सामान्य माणसांकडून माणुसकीची अपेक्षा कशी करता येईल? कुण्या एका नव्वद वर्षांच्या म्हातारीला करोना झाला म्हणून घरच्या मंडळींनीच तिला जंगलात सोडल्याची बातमी झटकन सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. पण अशा अनेक गोष्टी आपण निरुपयोगी किंवा हिताला अपायकारक म्हणून जंगलात सोडून आलोय, याची जाणीव आपल्याला आहे?