करोनामुळे जग बदलून जाईल, हे काही चाणाक्ष मंडळींनी सुरुवातीलाच ओळखलं होतं. आता मात्र हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येऊ लागलंय. आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल, कार्यशैली बदलावी लागेल, अर्थव्यवस्था बदलून जाईल, जागतिकीकरणाचं स्वरूप बदलेल, तंत्रज्ञानाचं स्वरूप बदलेल, विविध देशांच्या प्रतिनिधीगृहांचं कामकाज बदलेल इत्यादी विषय सध्या सर्वतोमुखी आहेत.
खरं तर “जग बदलणार’ म्हणजे नेमकं काय होणार, हे कुणालाच अजून ठामपणे सांगता आलेलं नाहीये. प्रत्येकजण आपापल्या परीनं बदललेल्या जगाचं कल्पनाचित्र काढू पाहतोय. खरं तर निसर्ग वगळता कुठलीच गोष्ट आपोआप बदलत नसते. त्यामुळं “जग बदलणार’ हा काही चमत्कार असणार नाही. प्रत्येकजण आपापलं जग आपापल्या आकलनानुसार आणि गरजेनुसार बदलत राहील आणि हळूहळू एक सामुदायिक चित्र दिसू लागेल, एवढंच सध्या सांगणं इष्ट. हे चित्रसुद्धा प्रत्येक देशात एकसारखं असेल असं नाही.
माणूस आजवर गरजेनुसार बदलला आणि म्हणूनच जग बदलत राहिलंय. परंतु हा बदल कुणाच्या गरजेनुसार होणार, हेही ठरलं पाहिजे. ज्या हेअर कटिंग सलूनमध्ये पूर्वी चार खुर्च्या असायच्या, तिथं आता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार दोनच खुर्च्या असतील. याचाच अर्थ कटिंगचा दर दुप्पट असेल, हा झाला गणिती बदल. परंतु तो व्यावहारिक आहे का, हे तपासणारी यंत्रणा “बदललेल्या जगात’ असणार का? हा खरा प्रश्न!
या “नव्या जगात’ आता आपल्याला केस कापायला जाण्यापूर्वी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. तिथे आपला आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक घेतला जाणार. नवीन जीवनशैलीचा भाग म्हणून हे मान्यच करायला हवं. अशा नोंदी ठेवणं पुढील काही काळासाठी तरी आवश्यकच असणार आहे; परंतु जग बदललं म्हणून आमचा खिसा बदलणार नाहीये, याचा विचार नेमकं कोण करणार आहे? किंबहुना खिशाची प्रकृती आता बिघडतच जाणार आहे. मग केशकर्तनासाठी दोनशे रुपये आणि दाढीसाठी शंभर रुपये कुठून आणणार? दाढी आम्ही घरीच करतो. फेशियल वगैरे आम्हाला करावंच लागत नाही. त्यामुळे त्याचा त्याग वगैरे करून 750 रुपये वाचवल्याचं सुख आम्हाला मिळणार नाहीये.
सलूनमध्ये कारागीर आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क होऊ द्यायचा नसेल, तर सलूनचं रूपांतर क्लिनिकल सलूनमध्ये करावं लागेल, असं सांगितलं जातंय. त्यासाठी दरमहा तीस ते चाळीस हजारांचा अतिरिक्त खर्च सलूनमालकाला करावा लागणार आहे. शिवाय, खुर्च्या लांब-लांब ठेवाव्या लागणार असल्यामुळे एका वेळी जास्त ग्राहकांना सेवा देता येणार नाही. अर्थातच, हा पैसा वसूल होणं आवश्यक आहे, हेही तितकंच खरं. परंतु त्यामुळे केस कापणं ही चैनीची गोष्ट ठरेल ना!
प्रत्येक व्यावसायिकाने आता याच पॅटर्ननुसार आपलं नवं दरपत्रक आमच्यापुढे धरलं तर कितीतरी गोष्टी आम्हाला बंद कराव्या लागतील. हॉटेलमध्ये दूर-दूर बसावं लागल्यामुळे चौघांचे पैसे दोघांकडून वसूल करणं भाग पडेल. तीच गत रिक्षा किंवा बसच्या बाबतीत होईल. पण या सर्वांना देण्यासाठी मध्यमवर्गीयानं पैसे आणायचे कुठून? बरं झालं आम्हाला फेशियलची आवड नाही. एकदाच केलं होतं; पण नाकात काहीतरी गेल्यामुळे सटासट शिंका आल्या होत्या. आता तर शिंकणंही अशक्य!
– हिमांशू