हिमांशू
करोना परदेशातून आपल्या देशात आला तेव्हा आपण बेसावध होतो. आपल्या राज्यात तो दाखल झाला तेव्हाही आपण फारसं लक्ष दिलं नाही. मग तो आपल्या जिल्ह्यात, शहरात आणि गावात दाखल झाला आणि आपण अचानक खूप घाबरलो. आता तो आपल्या गल्लीच्या तोंडाशी उभा आहे आणि घरात केव्हा येईल याचा नेम नाही.
अशा या वातावरणातसुद्धा आपण सध्याच्या परिस्थितीला “सामूहिक संसर्ग’ म्हणायचं की नाही, याबाबत जो गोंधळ सुरू आहे, ते पाहून भीतीची भावना वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. एक तर आपली मानसिकता विचित्र आहे. घरात असेपर्यंत आपण करोनाला घाबरतो. बाहेर पडल्यावर, गर्दीत गेल्यावर, मित्रांना भेटल्यावर आपल्याला त्याची आठवणही राहात नाही इतके आपण सैल होतो.
समोरची व्यक्ती जवळची असेल तर त्याला संसर्ग होण्याची शक्यताच नाही, अशी खात्री आपल्याला असते आणि ती व्यक्ती मास्क हनुवटीवर ठेवून आपल्याशी बोलत राहिली तरी फरक पडत नाही. समोरच्या व्यक्तीची आपल्याबाबत हीच भावना असल्यामुळे मास्कचं आवरण आपणही अलगद दूर करतो आणि नेहमीसारखे संवाद साधू लागतो. आपल्यासमोर कुणी शिंकलं किंवा खोकलं तरच आपल्याला भीतीची जाणीव होते. याच कारणामुळे संसर्ग वाढत चाललाय आणि आपण लॉकडाऊन असावा की नसावा, यावर चर्चा करतो आहोत.
जीवनशैली बदलणं किती अवघड असतं ना?
करोनाच्या आगमनाबरोबर आपण अनेक नवे, तांत्रिक शब्द ऐकले. कंटेन्मेंट झोन वगैरे आपण पहिल्यांदाच पाहिले. त्यातलाच एक शब्द होता “कम्युनिटी ट्रान्समिशन’ म्हणजे सामूहिक संसर्ग. ज्यांना प्रवासाचा कोणताही इतिहास नाही, अशा व्यक्तींना संसर्ग होऊ लागल्यास सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं ओळखावं, असं सांगितलं गेलं.
आज देशभरात रुग्णसंख्या लाखोंच्या घरात असताना देशात सामूहिक संसर्ग आहे की नाही, याबाबत गोंधळाचं वातावरण दिसतंय. हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ. मोंगा यांचं व्यक्तिगत मत असल्याचा खुलासा केला.
शहरी भागांमधून करोनाचा विषाणू आता ग्रामीण भागातही वेगानं पसरू लागलेला असल्यामुळे याला सामूहिक संसर्गच मानायला हवं, असं डॉ. मोंगा यांचं म्हणणं होतं; परंतु आयएमएच्या मते, शहरी भागांत क्लस्टर स्वरूपातच करोनाचा सामूहिक संसर्ग होत असून, ग्रामीण भागातील परिस्थिती तशी नाही. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची नावं सांगितली जात नसली, तरी ते ज्या भागात आढळलेत तिथं अधिक काळजी घेण्यासाठी ते भाग घोषित केले जातात. असे भाग वाढत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी आता सगळ्यांच्याच ओळखीपाळखीचे लोक पॉझिटिव्ह सापडू लागले आहेत. अशा परिस्थितीत याला सामूहिक संसर्ग म्हणायचं की नाही, या वादात सामान्य लोकांनी तरी पडताच कामा नये. संज्ञा आणि नावांपेक्षा परिस्थिती महत्त्वाची आहे आणि घराबाहेर पडणारा माणूस सोबत विषाणू घेऊन येऊ शकतो, अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. जरी एखाद्या ठिकाणी परिस्थिती एवढी बिघडलेली नसली, तरी तसं गृहित धरून काळजी घेणं, एवढाच पर्याय शिल्लक आहे.