मॅचेस्टर – करोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरी व अखेरची कसोटी आजपासून येथे सुरू होत आहे.
तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिजने आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, यजमान इंग्लंडने खेळ उंचावताना दुसरी कसोटी जिंकत मालिकेत बरोबरी केली. आता आजपासून (गुरुवार) सुरू होत असलेल्या कसोटीत विजय मिळवत मालिका जिंकण्याची संधी दोन्ही संघांना आहे.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका वाढल्याने जागतिक क्रिकेट ठप्प झाले होते. त्यानंतर इंग्लंड व वेस्ट इंडिज या दोन्ही देशांतील हा धोका खूपच कमी झाल्याने या मालिकेला प्रारंभ झाला. गेल्या दोन मोसमांत सरस कामगिरी केलेल्या वेस्ट इंडिजने संघबांधणीच्या प्रक्रियेतून जात असतानाही आश्चर्यकारक खेळ केला. यजमान इंग्लंडला पहिल्याच सामन्यात धक्का देताना सातत्यपूर्ण खेळाचे दर्शन घडवले.
मात्र, फलंदाजीतील सातत्य व गोलंदाजीत आलेले अपयश यांचा फटका त्यांना दुसऱ्या कसोटीत बसला व सामना अनिर्णित अवस्थेत जाणार असे वाटत असतानाच इंग्लंडने नाट्यमय विजय मिळवला. आता दोन्ही संघांना विजयाची समान संधी असली तरीही वेस्ट इंडिजला फलंदाजीत आणखी परिपक्व कामगिरी करावी लागणार आहे.