नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाच्या कमांडर परिषदेचे आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वायू भवन या हवाई दलाच्या मुख्यालयात या परिषदेचे आयोजन करण्यात आले. हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी संरक्षण मंत्री व संरक्षण मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याप्रसंगी स्वागत केले.
हवाई दलाच्या कमांडरना संबोधित करताना, संरक्षण मंत्र्यांनी, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमता वाढविणाऱ्या सक्रिय प्रतिसादाचे कौतुक केले. बालाकोट येथे करण्यात आलेले हवाई हल्ले, तसेच पूर्व लडाखच्या सध्याच्या परिस्थितीला उत्तर देताना भारतीय हवाई दलाची शस्त्रे त्वरित तैनात केल्याने विरोधकांना कडक संदेश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या सशस्त्र दलांच्या क्षमतेवर जनतेच्या असलेल्या विश्वासामुळे, आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा देशाचा संकल्प दृढ आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी संकेत दिले व कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी तयार राहण्याचे भारतीय हवाई दलाला आवाहन केले.
या हवाई दल कमांडर परिषदेसाठी निवडलेली संकल्पना- “भारतीय हवाई दल- आगामी दशकात’- ही येणाऱ्या काळात स्वदेशीकरणाच्या दिशेने प्रयत्न वाढविण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. सशस्त्र सैन्याच्या आर्थिक किंवा इतर सर्व गरजा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी सर्व कमांडर्सना दिली.
तीन दिवसांच्या परिषदेदरम्यान, येणाऱ्या सर्व धोक्यांचा सामना करण्यासाठी, पुढील दशकात भारतीय हवाई दल क्षमता वाढवण्यावर विचारविनिमय करेल, तत्पूर्वी कमांडर सद्य परिचालन परिस्थिती व तैनातींचा आढावा घेतील.