हिमांशू
लॉकडाऊनचे पहिले दिवस आठवतात? कोविडच्या धास्तीने प्रत्येकजण आपापल्या घरात कैद झाला होता आणि मोठमोठ्या शहरांमधला जीवघेणा शुकशुकाट टीव्हीच्या माध्यमातूनच पाहावा लागत होता. घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद मिळत होता.
अत्यावश्यक सेवेचा “टॅग’ असणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल मिळत होतं. कारखाने आणि वाहतूक थांबल्यामुळे कार्बन उत्सर्जन संपूर्ण जगभरात एकाएकी थांबलं. कारखान्यांमधलं सांडपाणी नद्यांमध्ये सोडणं थांबलं. नद्या एकाएकी स्वच्छ दिसू लागल्या.
यमुना हीसुद्धा एक नदी आहे, हे दिल्लीकरांना प्रथमच समजलं. ज्यांच्या घरातून नदी दिसते, त्यांनी स्वच्छ पाण्याचे फोटो काढून मित्रांना पाठवायला सुरुवात केली आणि “आश्चर्य’ म्हणूनच हे फोटो पाहिले गेले.
हिमालयाची शिखरं जिथून गेल्या चाळीस वर्षांत दिसली नव्हती, तिथून ती दिसू लागली. दुसरीकडे, कोलाहल थांबल्यामुळे प्राणी आणि पक्षी (पाळीव आणि मुक्त) काही काळ सैरभैर झाले. नेमकं काय घडलंय, हे त्यांना समजेना. जंगलांपासून जवळ असलेल्या शहरांमध्ये चक्क वन्यजीव फिरू लागले.
पक्ष्यांचा किलबिलाट आपण आतापर्यंत दुर्लक्षित केला होता की आता खरोखर वाढलाय, हे लोकांना समजेनासं झालं. एकंदरीत, लॉकडाऊनच्या नकारात्मक वातावरणात हळूहळू एक सकारात्मक गोष्ट लोकांसमोर उलगडत गेली. ती म्हणजे, आर्थिक प्रगतीच्या शर्यतीत आपण कितीतरी गोष्टी मागे टाकल्यात. मुख्य म्हणजे, या पृथ्वीवर पैसा आणि आपण याव्यतिरिक्त बरंच काही आहे!
आपल्याभोवती असंच वातावरण कायम राहिलं तर..? विचार चांगला आहे; पण हे शक्य नाही हे त्यावेळीच ठाऊक होतं. आपण आणि आपली अर्थव्यवस्था वगळता इतर कुणाचंही “कमबॅक’ आपल्याला यापुढे सहन होणार नाही, अशा अवस्थेला आपण पोहोचलो आहोत.
खिसा भरण्याची किंमतसुद्धा आपण त्याच खिशातून मोजू शकतो, हा शोध आपल्याला लागलाय. वातावरण सहन झालं नाही, तर निसर्गात फिरायला जाऊन बक्कळ खर्च करू. थोडे जास्त पैसे मिळाले तर मोकळ्या हवेत फार्महाउस घेऊ; पण ही घोडदौड आता थांबणे नाही.
लॉकडाऊन संपला की भयावह प्रदूषण “कमबॅक’ करणार, हे वास्तव अपेक्षेपेक्षा खूपच लवकर पाहावं लागतंय. दिल्ली हे तर आपलं राजधानीचं शहर. तिथे आता प्रदूषणामुळे “लॉकडाऊन’ लावण्याची वेळ आलीय. दिवाळीत फटाक्यांबाबत न्यायालयानं बरेच आदेश दिले होते; पण अंमलबजावणी कोण करणार? शिवाय, पिकांचे अवशेष शेतातच जाळून टाकण्याच्या प्रक्रियेला कितीही पर्याय दिले तरी ती खोडही जाणार नाही.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या शेतांमधला धूर राजधानीत येतो. आज दिल्लीत चार फुटांच्या पलीकडचं दिसेनासं झालंय. एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 556 च्या अत्युच्च पातळीवर पोहोचलाय. मास्कसक्तीची अंमलबजावणी आपोआपच होतेय, हे त्यातल्या त्यात समाधान!
मास्कशिवाय घराबाहेर न पडणं, शाळांना सुटी असणं, नोकरदारांचं “वर्क फ्रॉम होम…’ “लॉकडाऊन’ यापेक्षा वेगळा कुठे होता? पण आज कोविडमुळे नव्हे तर विषारी हवेमुळे दिल्लीकरांवर ही वेळ आलीय. आपल्याकडे मुंबईत प्रवेश केल्याबरोबर प्रदूषण नाकाला जाणवू लागतं.
तिथला एक्यूआय सध्या 169 आहे. एवढ्यावरून दिल्लीतल्या परिस्थितीची कल्पना सहज करता येईल. खरोखर, कोविडच्या धक्क्यातून बाहेर येऊन आपण जबरदस्त “कमबॅक’ केलंय. प्रदूषणाचा सगळा “बॅकलॉग’ आपण भरून काढणारच!