– माधव विद्वांस
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी क्रांतिकारक रासबिहारी बोस यांची आज जयंती. त्यांचा जन्म 25 मे 1886 रोजी आजोळी सुबलदाह (बरद्वान) येथे झाला. त्यांचे वडील विनोद बिहारी सिमल्याला सरकारी छापखान्यात नोकरी करीत. त्यांच्या आईचे लवकरच निधन झाल्याने त्यांच्या सावत्र आई व आजोबा कालिचरण यांनी रासबिहारी यांचे संगोपन केले. श्रीष घोष व अमरेंद्र चटर्जी यांच्याकडून क्रांतिदीक्षा घेतली. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्यांना त्यांच्या जवळ सिमल्याला आणले व घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्हीत चांगली प्रगती झाल्यावर त्यांनी ते जेथे काम करायचे त्या छापखान्यात नोकरीस लावले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात रासबिहारींनी नोकरी धरली. वर्ष 1908 पासून 1913 पर्यंत पाच वर्षे कशीबशी नोकरी टिकली.
वर्ष 1912 मधे त्यांनी चंद्रनगरला जाऊन बाँब साहित्य निर्मितीसाठी अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. त्यांनी बसंतकुमार नावाच्या सहकार्याला पूर्ण शिक्षण दिले. त्यानंतर बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बाँब टाकण्याची योजना आखली. बसंतकुमारला लाहोरला धाडले. 22 डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून येणार होता. आदल्या दिवशी रासबिहारी डेहराडूनहून व बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले.
दुसर्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बॉम्ब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. शरीररक्षक ठार झाला. दोघेही नंतर लाहोर-डेहराडूनला परतले. पुढे लाहोर गटाने सर्वत्र धमाल उडवून दिली, पण शेवटी बिंग फुटले. बसंतकुमारसह चौघे पोलिसांच्या तावडीत सापडले व चौघांना फाशी देण्यात आली. रासबिहारींवर वॉरंट होते पण ते बनारसला गेले. तेथील अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
गदर चळवळ सुरू झाली. गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रॅन्सिस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या. तळेगाव ढमढेरे येथील विष्णुपंत पिंगळे रासबिहारींना भेटले. त्यांच्या विनंतीवरून रासबिहारी पंजाबला आले. थोड्याच अवधीत त्यांनी उठावाची योजना आखली. मात्र एका घरभेद्यानेच संकल्पित उठावाची माहिती पुरविल्यामुळे आदल्या दिवशीच धरपकड झाली.
या वेळीही रासबिहारी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अखेर जून 1915 मध्ये पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने ते जपानला गेले. जपानी सरकारनेही त्यांना ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले. तेव्हा ते भूमिगत झाले. पुढे शोभा या जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले. जपानी जीवनाशी ते समरस झाले.
पूर्व आशियातील हिंदी लोकांची मार्च 1942 मधे त्यांनी हिंद स्वराज्य लीग स्थापन केली. हिंदी युद्धकैदी व इतर नागरिकांमधून आझाद हिंद फौज उभी करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. जुलैमध्ये लीगचे दुसरे अधिवेशन बँकॉकला भरले. त्यात आझाद हिंद सेनेला जपानी सेनेच्या समान दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारावे असे जाहीर आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आले.
वर्षभराने नेताजींकडे दोन्ही संघटना सुपूर्द करून रासबिहारी प्रमुख सल्लागार झाले. त्यांचा मुलगा महासिदे जपानी फौजेत होता. त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीरमरण आले. दुसरे महायुद्ध चालू असतानाच त्यांचे 21 जानेवारी 1945 रोजी निधन झाले. त्यांची पत्नी शोभा व मुलगी टेटूकी जपानमध्येच स्थायिक झाल्या.