नवी दिल्ली – केंद्र सरकारने आमच्यावर कितीही छापे टाकले किंवा कितीही कारवाया केल्या तरी आम्ही केंद्राकडे थकित असलेला पश्चिम बंगालचा निधी त्वरीत अदा करावा या मागणीवर ठामच राहणार आहोत असे तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या निधीसाठीचा आमचा लढा अशा कारवायांनी दबला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या लोकसभा मतदार संघातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, आम्ही भाजपची जमीनदारी संस्कृती संपुष्टात आणू. ते केंद्रीय पथके पाठवून छापे टाकत आहेत. आम्हाला छाप्यांची पर्वा नाही, पण त्यांनी जनतेचा हक्काचा निधी दिलाच पाहिजे. केंद्राने आपला निधी न दिल्यास केंद्राला त्यांच्याच भाषेत लोक उत्तर देतील. हा निधी १५ दिवसांत देण्यास केंद्र बांधील आहे, असा प्रस्थापित कायदा आहे. बंगालमध्ये त्यांचा पराभव झाला म्हणून निधी रोखला जात आहे, असे ते म्हणाले.
मोदी सरकारने पश्चिम बंगाल सरकारचा एकूण १ लाख १८ हजार कोटी रूपयांचा निधी थकवून आमची आर्थिक नाकेबंदी केली आहे. त्यातून या राज्यातील जनतेच्या अधिकारावरच गदा आणली गेली आहे. आगामी निवडणुका लोकांच्या हक्कांवर आधारित असतील. जर लोक त्यांच्या अधिकारावर ठाम राहिले आणि त्यानुसारच त्यांनी मतदान केले तर यापुढे कोणत्याही पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा मंत्र्यांना लोकांचे अधिकार हिराऊन घेण्याचे धाडस होणार नाही असेही बॅनर्जी म्हणाले.
केंद्र सरकारने पश्चिम बंगालचा ग्रामीण रोजगार हमी योजना, आवास योजना या महत्वाच्या योजनांसह अनेक येाजनांचा निधी रोखून धरला आहे. त्याचा परिणाम राज्यातील लाखो मजुरांच्या मजुरीवर झाला आहे असा दावा या आधी ममता बॅनर्जी यांनीही केला आहे.