नवी दिल्ली – संदेशखळी हे बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यात आहे, जिथे नुकतीच हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर बंगालच्या राज्यपालांनीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे आता अधिक धीट झालेले तृणमूलचे गुंड मुलींचे अपहरण करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे.
संदेशखळी ही घटना सभ्य समाजात घडणारी सर्वात वाईट घटना असल्याचे राज्यपालांनी म्हटले होते. तेथे महिलांची छेड काढली जाते आणि त्यांच्यावर हल्ले केले जातात. सत्ताधारी सरकारला खंबीरपणे आणि प्रभावीपणे काम करावे लागेल.
संदेशखळी येथील आंदोलक महिलांनी आरोप केला होता की शहाजहान आणि त्याच्या ‘टोळी’ने त्यांचा लैंगिक छळ करण्याव्यतिरिक्त, जबरदस्तीने जमिनीचा मोठा भाग बळकावला होता. शहाजहानचे समर्थकही रस्त्यावर उतरल्याने तणाव आणखी वाढला.
भाजपचे आमदार आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेन्दू अधिकारी यांनी संदेशखळीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने येथील राजभवनात जाऊन संदेशखळीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोस यांच्या हस्तक्षेपाची मागणी करणारे निवेदन सादर केले.