नवी दिल्ली – २२ जानेवारी रोजी सद्भाव रॅली काढण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या घोषणेवर भारतीय जनता पार्टीकडून तिव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले असून रॅलीच्या वेळेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राजकीय लाभासाठी सांप्रदायिक तणाव निर्माण करणे मुख्यमंत्र्यांनी टाळले पाहिजे असेही मालवीय यांनी म्हटले आहे.
आपल्या पोस्टमध्ये मालवीय यांनी म्हटले आहे की २२ जानेवारी या शुभ दिवशी जेंव्हा संपूर्ण भारत अयोध्या धाम येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार बनणार असेल तेंव्हा लाखो हिंदुंच्या भावनांची उपेक्षा करत प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी एका राजकीय रॅलीची घोषणा केली आहे. हा प्रकार म्हणजे धार्मिक तणाव निर्माण करण्याखेरीज अन्य काहीही नाही. त्या दिवशी हिंदू व्रत धरतील, पुजा करतील आणि मंदिरात जातील तेंव्हाच हे केले जाणार आहे.
रामनवमीच्या शोभयात्रेवर दगडफेक करण्याची त्यांनी कशी परवानगी दिली होती हेही सगळ्यांनी पाहिले आहे. त्या घटनेनंतर सहा दिवसांनी हनुमान जयंती होती. मात्र तेंव्हा केंद्रीय दल तैनात केल्यामुळे अशी दगडफेकीची घटना घडली नाही. गेल्याच आठवड्यात बंगालच्या पुरूलीया येथे साधुंना मारहाण करण्यात आली तर शेख शहाजहांसारखा अद्याप फरारच आहे.
राजकीय फायद्यासाठी तणाव निर्माण करण्याचा प्रकार ममतांनी टाळावा. त्या दिवशी राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या आपल्या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्या दिवशी काही अप्रिय घटना घडली तर त्याला ममता बॅनर्जीच जबाबदार असतील.