औरंगाबाद – औरंगाबाद शहरामध्ये तीन आमदार आहेत. त्यांच्यावर मनपा निवडणुकीची जबाबदारी असेल. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि मी मोटबांधणी करणार असल्याचेही शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. तसेच सत्तार हे हिरवे राहिले नसून भगवे आहेत. त्यांनी कार्यालयही भगवे केले आहे. पक्षप्रमुखांनी जादू केली आहे त्यांच्यावर त्यामुळे ते भगवे झाले आहेत, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांना माजी आमदार किशनचंद तनवानी यांच्यासंदर्भात विचारले असता तनवाणी हे भाजपमधून आलेले आहेत. त्यांच्यासोबत भाजपमध्ये असलेले इतरही अनेकजण शिवसेनेत येतील. पक्षवाढीसाठी ते गरजेचे आहे. त्यामुळे तनवानी यांच्याकडे एखादे पद दिले जाईल. त्यांचा योग्य सन्मान व्हावा, अशी शिफारस मी केली आहे, असे खेरे म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यातच औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना आमदार अंबादास दानवे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. यासंदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले आहे.
शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवतेज आणि शिवसंवाद या मोहिमांवरून राजकीय पडसाद उमटत आहेत. यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेत नेता हे सर्वांत मोठे पद आहे. नेत्यांनंतर उपनेते असतात. मी नेता आहे. पक्षात केवळ 13 नेते आहेत. त्याखाली संपर्कप्रमुख पद आहे. त्याखाली जिल्हा प्रमुख पद येते. अंबादास दानवे हे जिल्हा प्रमुख असल्याने ते खुप छोटे आहेत. त्यांची माझ्याशी तुलना होऊच शकत नाही असे म्हटले आहे.