आजी-आजोबांच्या गोष्टींमध्ये नातवंडे रमतात, खेळतात आणि मोठी होतात. वृद्धापकाळात मुलापेक्षा नातवंडेच आजी-आजोबांचा आधार बनतात. त्यामुळे नातवंडे ही आजी-आजोबांचे प्रतिबिंबच समजली जातात. मात्र, आज हेच “प्रतिबिंब’ आजी-आजोबांसाठी “काळ’ ठरत असल्याचे पुण्यातील दोन घटनांमधून दिसून येते. पैसा, दागिने, मालमत्ता यासाठी नातवाने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. अवघ्या आठ दिवसांत अशा प्रकारे घडलेल्या दोन घटनेने पुणे हादरले आहे.
राहते घर आणि दागिने मिळविण्याच्या हव्यासापोटी 20 वर्षीय नातवाने आजीचा खून केला. धक्कादायक म्हणजे गुन्ह्यात आपण पकडले जावू नये यासाठी नातवाने झाड कापण्याचे कटर मशिन विकत आणून आजीचे तुकडे केले. सर्व तुकडे पोत्यात भरून ते वेगवेगळ्या ठिकाणी नदीमध्ये फेकून दिले. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना एक महिना लागला. मात्र, या गुन्ह्याची माहिती वडिलांना असूनही त्यांनी लपवल्यामुळे दोघांना अटक केली. ही घटना 5 सप्टेंबरला उघडकीस आली. त्याला दहा दिवसही झाले नाही, तेच वारजे येथील आकाशनगरमध्ये कर्जाचे पैसे भरण्यासाठी नातीनेच आजीचा खून करून तिच्या अंगावरील दागिने चोरले. दागिने मोडून मिळालेल्या पैशातून कर्ज फेडले. मात्र, क्षुल्लक रकमेसाठी आजीचा खून करण्यापर्यंत नातीचे धाडस गेले आणि होत्याचे नव्हते होऊन बसले. विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात अशा घटनेने खळबळ उडाली आहे.
वयोवृद्ध सुरक्षित आहेत का?
पैसा, मालमत्तेसाठी मुलांकडून आई-वडिलांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वेळोवेळी समोर आल्या. मात्र, खुनाच्या घटना घडल्या नाही. मात्र, सध्या बदलेल्या पिढीसमोर वाढलेली स्पर्धा, त्यामुळे वाढलेला मानसिक त्रास आणि अवास्तव खर्च यामध्ये कर्जबाजारी होतात. हे कर्ज फेडण्यासाठी किंवा अन्य कारणांनी घरातील वृद्ध व्यक्तींना त्रास देण्याच्या घटना घडतात. आता तर त्यांना जिवे मारण्याचा घटना समोर येत आहेत. त्यामुळे खरच वयोवृद्ध व्यक्ती घरात सुरक्षित आहेत का? पैसा, मालमत्तेसाठी वयोवृद्ध व्यक्तींचा जीव गमवावा लागू नये, यासाठी वेळीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.
पालकांची जबाबदारी
वडिलोपार्जित जमीन आहे, पैसा आहे; मात्र त्याचा उपभोग घेता येत नाही. त्यात वाईट मित्रांची संगत. अशामध्ये पैशासाठी एखाद्याचा महारहाणीसह खून करायचे म्हटले तरी आत्ताच्या पिढीतील तरुण मागे-पुढे विचार करत नाहीत. क्षुल्लक गोष्टीवरून घडलेल्या घटना जीव घेण्यापर्यंत पोहचतात. ऑनलाइनमध्ये गुंतलेली तरुणाई अमिषाला बळी पडते आणि आर्थिक नुकसान करून घेते. त्यामुळे संताप, चिडचिड, मानसिक खच्चीकरणामध्ये तरुण रागाच्या भरात टोकाची पावले उचलत आहेत. त्यामुळे अशा तरुणांना मानसिक उपचारासह समुपदेशनाची गरज आहे. मुले मोठी झाली म्हणून जबाबदारी न झटकता, त्यांच्यावर लक्ष ठेवणे पालकांची जबाबदारी आहे.