माजी सरपंच जयश्री ताकवणे यांना सामाजिक व राजकीय वारसा हा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला आहे. जयश्री यांचे थोरले दीर माऊली ताकवणे हे गावच्या राजकारणात असून सध्या ते भाजपचे दौंड तालुकाध्यक्ष आहेत. त्यामुळे घरी लोकांचा नेहमीच राबता असल्याने सौ. जयश्री यांनी समाजकारण व राजकारण जवळून पाहिले आहे. माहेरचे संस्कारमय कुटुंब आणि सासरी राजकीय, सामाजिक वारसा मिळाल्याने गावविकासाचा गाडा हिमतीने त्यांनी चालविला आहे. त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 100 कोटींची विकासकामे गावासाठी आणली आहे. त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप…
सौ. जयश्री ताकवणे यांचे माहेर वरवंड हे आहे. वडील स्व: परशुराम गुलाबराव दिवेकर व आई श्रीमती जनाबाई दिवेकर व ज्येष्ठ बंधू सुभाष हे शेती व्यवसाय करतात. दुसरे बंधू जिजाबा दिवेकर हे नगरपालिकेत होते. सौ. जयश्री शरद ताकवणे यांचे शिक्षण 12 वीपर्यंत झाले आहे.
सरपंच जयश्री ताकवणे व त्यांच्या सदस्य सहकाऱ्यांनी आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी कोट्यवधींचा विकास निधी आणून सर्वागीण विकास करण्यात ते यशस्वी झाले आहेत. गावामध्ये संपूर्ण बंदिस्त गटारीचे काम झाले आहे. 100 टक्के गाव हागणदारीमुक्त झाले असून स्वच्छतेबाबतीत कुचरामुक्त गाव केले आहे. वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून दिल्याने लोकसहभागातून 400 ते 500 झाडे लावून त्यांचे पूर्ण संगोपन केले. वृक्षसंवर्धनासाठी ग्रामपंचायतीने स्व-मालकीचा पाण्याचा टॅंकर घेतला आहे.
महिलांसाठी महिला गृहउद्योग प्रशिक्षण शिबिर घेतले. त्याद्वारे आठ बचत गट एकत्र येऊन 100 महिलांनी भरारी महिला उद्योग स्थापन केला आहे. त्याद्वारे अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. भविष्यात अजून मोठा व्यवसाय करण्याचा निर्धार आहे. महिलांचे सबलीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रपंचाचा गाडा ओढताना महिलांना उसंत मिळावी, यासाठी पाच वर्षांत पाच वेळा महिला सहलींचे आयोजन केले. महिलांसाठी विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली. ग्रामपंचायतीमार्फत डिजिटल सखी प्रोग्राम प्रभावीपणे राबविला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार वितरण करून महिलांचे मनोबल वाढविले. बचत गटांसाठी उमेद अभियान राबवून महिलांना उभारी दिली आहे. सध्या 35 हून अधिक बचतगट कार्यरत आहेत.
लोकसंख्या वाढल्याने सध्या ग्रामपंचायत कार्यालय अपुरे पडू लागले. गावच्या प्रगतीत सुविधायुक्त ग्रामपंचायत इमारतीसाठी नवीन कार्यालयाचे 1 कोटी 25 लाख रुपयांची सुसज्ज इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. एकूण 6 वॉर्डमध्ये भेदभाव न ठेवता विकासकामे केली आहेत. सध्याची पाणीपुरवठा योजना फेल गेल्यामुळे नव्याने सर्व वाड्या-वस्तीवर पाणीपुरवठा होईल, अशी 5 कोटी रुपयांची स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून आणली. लवकरच ती कार्यान्वित होईल. 90 टक्के अंतर्गत रस्ते हे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे केले आहेत. भीमा नदीवरील स्मशानभूमी घाट आणि परिसराचे सुशोभिकरण केले. तुकाईदेवी मंदिर व विठ्ठल मंदिर परिसराचे सुशोभिकरण केले. आठवडे बाजाराची समस्या लक्षात घेऊन बाजारतळाची व्यवस्था करण्यात आली. आता सायंकाळी सात वाजेपर्यंत बाजार भरत आहे.
पारगावच्या परिसरातील 40 किलोमीटर लांबीचे शिव-पाणंद रस्त्यासाठी ग्रामीण मार्ग म्हणून घोषित करून भरीव निधी मंजूर केला आहे. सर्व शिव-पाणंद रस्ते डांबरीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेही काम तडीस लावणार आहोत.
लिप्ट वस्ती रस्ता खराब झाल्याने नागरिकांचे हाल होत होते. शिरूर-सातारा रोड ते नवनिर्माण न्यास असा 1 कोटींचा रस्ता मंजूर झाला आहे. पारगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्मशानभूमीपर्यंतचा पेठेच्या रस्त्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गाढळवाडी फाट्यापासून ते शिंदेवाडीपर्यंतच्या रस्त्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पारगाव – हंडाळवाडी केडगाव रस्त्यासाठी (हंडाळवाडी ते केडगाव) 2 कोटी रुपये मंजूर आहेत. देलवडी रोड ते जहागीरदार वस्ती रस्त्यासाठी 10 लाख रुपये तर देलवडी रोड ते मारुती बोत्रे यांचे घर रस्त्यासाठी 25 लाख रुपये. साहेबराव नगरमधील रस्त्यासाठी 10 लाख रुपये मंजूर आहेत.
घरकुलांचे स्वप्न साकारले
पारगाव हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत हद्दीमध्ये समाविष्ट झाले आहेत. झ.च.ठ.ऊ.अ. ने पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेसाठी 2 लाख 50 हजार रुपये अनुदानाची योजना आणली होती. त्यातून गावात 60 च्या आसपास कामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत. नवीन बांधकाम सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत घरासाठी अनेक लाभार्थ्यांना 2 लाखांचे अनुदान प्राप्त होणार आहे. असा कोट्यवधींचा फायदा ग्रामस्थांचा होत आहे. यापुढे मिळणार आहे.
प्रमुख मार्गासाठी भरीव निधी
2018 च्या ग्रामपंचायत निवडणूक वेळेस शिंदेवाडी गाढळवाडी, मोसे पुनर्वसन या ठिकाणी स्वच्छ फिल्टर पाणी योजना करू, असा शब्द दिला होता. ते आश्वासन पूर्ण केले आहे. लवकरच गावकऱ्यांना स्वच्छ व फिल्टरचे पाणी मिळणार आहे. आमदार राहुल कुल यांच्या दूरदृष्टीतून गावातून जाणारे प्रमुख मार्ग पारगाव गलांडवाडी- खुटबाव-यवतमार्गे सासवड हा 600 कोटी रुपये व पारगाव-राहू-वाघोली हा मार्ग 600 कोटी मंजूर झाला आहे. पारगाव-नानगाव-सिद्धटेक हा अष्टविनायक मार्ग पूर्ण झाला आहे. शिंदेवाडी 22 फाटा ते पारगांव हा 3 कोटींच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होत आहे.
पारगावातील सर्व विकासकामे, मंजूर कामे व चालू असलेली कामे सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या समन्वयातून करू शकलो. यासाठी ग्रामस्थांनी आम्हावर विश्वास टाकून आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्ही आमदार राहुलदादा कुल, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व पदाधिकारी आभारी आहोत.
– सौ. जयश्री शरद ताकवणे, सरपंच पारगाव (सा.मा).
गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी पुरेपूर काळजी
आमदार कुल यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांचे 30 हजारांपासून ते 19 लाख रुपये खर्चापर्यंतच्या विविध शस्त्रक्रिया मोफत करून घेतल्या. अनेक रुग्णांची विविध खासगी रुग्णालयांमधून लाखो रुपयांपर्यंतची दवाखान्याची बिले कमी करून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. अनेकांना जीवदान मिळाले तर कित्येक जणांचे आयुष्य वाढण्यास मदत झाली. करोना काळात जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण सेंटर सुरू करून अनेक गरीब रुग्णांना फायदा झाला.
संकलन : त्रिभूज शेळके, पारगाव.