पुणे – भारती विद्यापीठाची ‘इर्षा’ संशोधन संस्था आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने “रोगप्रतिकारक शक्ती आणि जैविक परीक्षण राष्ट्रीय केंद्र’ धनकवडीतील शैक्षणिक संकुलात सुरू होणार आहे. या केंद्रासाठी ‘इनोव्हेशन इंडिया’या कार्यक्रमांतर्गत “इर्षा’ या संशोधन संस्थेला 16 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. हे केंद्र रोगप्रतिकारक लस निर्मिती तसेच जैविक परीक्षणाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या केंद्राचे उद्घाटन दि.3 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता केंद्रीय बायोटेक्नॉलॉजी विभागाचे सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, “बायरॅक’च्या व्यवस्थापकीय संचालिका अनुजा भल्ला, एन.बी.एम.च्या मिशन डायरेक्टर डॉ. कविता सिंग, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, इर्षाचे संचालक डॉ. ए. सी. मिश्रा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
डॉ. शिवाजीराव कदम यांनी “हे केंद्र रोगप्रतिकारक लस आणि औषधे निर्मिती करणाऱ्या महत्वाच्या संशोधन संस्थांबरोबर काम करेल आणि विषाणू विरोधी औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार’ असे सांगितले.
करोना विरुद्धच्या लढाईत हे केंद्र वरदान ठरेल. दर महिन्याला चार हजार “पीआरएनटी’ चाचण्या करण्याची या केंद्राची क्षमता आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या अत्युच्च दर्जाच्या जीव सुरक्षा सुविधांची उपलब्धता हे या केंद्राचे वैशिष्ट्य आहे.
– डॉ. एस. सी. मिश्रा, संचालक, “इर्षा’ केंद्र, भारती विद्यापीठ