मुंबई- महाराष्ट्रात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना करोनामुळे मोठा फटका बसला असून अन्यही कामगारांना त्यातून मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. राज्यातील बाहेरचे हजारो मजूर हाताला काम नसल्याने महाराष्ट्र सोडून आपल्या मूळ राज्यात सुरुवातीला निघून गेले आहेत. जे अजून राज्यातच आहेत त्यांना रेल्वे बंद झाल्याने स्वतःच्या राज्यात परतणे शक्य झालेले नाही. त्यांची परिस्थिती भीषण झाली आहे. रोजगारही नाही आणि गावालाही जाता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. त्यातच हॉटेल व खानावळी बंद असल्यानेही त्यांचे मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये बरेच हाल सुरू असल्याची स्थिती आहे.
राज्य सरकारने मंगळवारपासून लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्याने शंभरी ओलांडली असल्याने राज्य सरकार अत्यंत काळजी घेत आहे. जवळपास सर्व राज्यातील सर्वच व्यवहार बंद आहेत. पोलिसांनी विविध जिल्ह्यांच्या सीमा सील केल्याने अनेकांना आहे, तेथेच अडकून पडावे लागले आहे.
मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या घरातूनच काम करण्याची अनुमती दिली आहे. त्याचा त्यांना लाभ होत असला तरी जे कर्मचारी मजूर किंवा रोजंदारीवर काम करीत आहेत त्यांना कोणी वालीच उरला नाही. त्या खेरीज सुतारकाम, गवंडीकाम, प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशी कामे करणाऱ्यांचीही रोजीरोटी बंद झाली आहे. हमाली करणाऱ्यांनाही घरी बसावे लागल्याने त्यांची चिंताही मोठी आहे. बाहेरील राज्यातील अनेक जण आता रेल्वे पुन्हा सुरू होण्याची वाट पाहात आहेत.