Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजपचेच सरकार येईल असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणून आपण तिसरी टर्म पूर्ण करणार असल्याची गॅरंटी लाखोंच्या साक्षीने दिली. तिसरी टर्म पूर्ण करताना भारत देश जगातील टॉप तीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल, असा आत्मविश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला .
दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर या ठिकाणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठ्या ३० हजार पैकी १५ हजार घरांच्या असंघटित कामगार वसाहतीचे लोकार्पण आणि पाच लाभार्थ्यांना चावी प्रदान करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
तसेच सुनिता जगले, लता दासरी, रिजवाना मकानदार, बाळूबाई वाघमोडे, आणि लता आडम या पाच लाभार्थ्यांना पंतप्रधानांनी घरांची चावी प्रदान केली. तसेच काही लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश दिले. नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम स्थळी आगमन झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान पंतप्रधानांनी आगामी काळात आपणच सत्तेत येणार असल्याचे भाष्य करत भाजपा गरिबांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी आत्मनिर्भर भारत बनवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
परिस्थिती नसल्यामुळे अनेकांना हक्काचे घर घेता येत नाही अशा गरजूंसाठी भाजप सरकारने देशभरात सुमारे चार कोटी घरांचे वाटप केले आहे आणि पुढील पाच वर्षे हे काम असेच सुरू राहणार असल्याचे सांगत माझे सरकार गरिबांसाठी समर्पित सरकार आहे. गरिबांचे स्वप्ने पूर्ण करणे हाच माझा संकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.
गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी
यावेळी मोदी यांनी काँग्रेसच्या गॅरटी योजनेवर निशाणा साधत मोदी यांची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असल्याचा विश्वासही व्यक्त केला. केंद्र सरकारच्या माध्यमातून आरोग्य, रोजगार, निवारा, मुलभूत सोयीसुविधांच्या योजनांची माहिती देत मोदी सरकारने पूर्ण केलेली ही गॅरंटी आहे. भाजपची नियत साफ आणि निष्ठा देशाप्रती आहे. त्यामुळे भारताला विकसीत राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या सरकारने दिलेली गॅरंटी आम्ही पूर्ण करणार असल्याचेही मतही पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आज गरीब आणि गरजूंना घरे मिळत असल्याचे सांगत दावोस येथे झालेल्या वेगवेगळ्या करारांमध्ये तीन लाख ५३ हजार कोटींचे करार करण्यात आले असल्याचे सांगितले.
त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदींची गॅरंटीचा उल्लेख सातत्याने करण्यात येत होता. रे नगरच्या घरांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले आणि त्यानंतर त्याचे लोकार्पण हेसुद्धा पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जात आहे. यालाच मोदींची गॅरंटी म्हणतात अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
पंतप्रधान मोदी झाले भावुक !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ हजार घरांचे लोकार्पण केल्यानंतर असंघटित कामगारांशी संवाद साधताना त्यांनी लहानपणी आपल्याला असे घर मिळाले असते तर…… असे म्हणत ते काही वेळ भाषण थांबवून भावुक झाले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी तडाखेबाज भाषण ठोकले.
उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, आणि…
रे नगर गृहप्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम मास्तर यांनी प्रास्ताविकाला सुरुवात करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेताना उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा त्यांच्या नावाचा उल्लेख केला. गडबड झाल्याचे लक्षात येताच आडम मास्तरानी त्यामध्ये सुधारणा केली आणि गडबड झाल्याचे सांगितले.यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
सोलापुरी चादर आणि जॅकेट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सोलापुरी चादर आणि गारमेंट उद्योगाचा गौरवपूर्ण असा उल्लेख केला. आपल्या अंगातील जॅकेटकडे हात करून त्यांनी ये जो मैने जॅकेट पहना है वह जॅकेट सोलापूर मे काही मेरा चाहता भेजता है. मैने उसे मना करने पर भी उसने मुझे जॅकेट भेजा है. मैने फोन कर उसे डाटा भी, फिर भी मुझे ओ जॅकेट भेजता है ,आज भी वो मुझे देने के लिए जॅकेट लेके आया है ,असे पंतप्रधान मोदींनी सांगताच समोर बसलेले टेलर बालाजी यज्जा यांनी हाच उंचावले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.