मुंबई – देशभरातील विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत दोन दिवस बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असून आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र या बैठकीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. नुकतेच आशिष शेलार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीसह उद्धव ठाकरे यांच्या सडकून टीका केली आहे.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हंटले की, “बाळासाहेबांची शिवसेना आता भाजपसोबत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत ते आज राहुल गांधींसोबत आहेत. मूर्खाच्या नंदनवनात जगणारी लोकं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आहेत. उद्धवजींच वाक्य म्हणजे बालिशपणा. आमच्याकडे बरेच पंतप्रधान यांचे उमेदवार आहेत. घरात बसून राजकारण करण्याची सवय झाली आहे का? प्रत्येक विभागाला वेगळा पंतप्रधान असं आहे का? जी मंडळी जमली आहेत ते कोण? उद्धवजींनी उत्तर द्यावं बाळासाहेबांनी ज्यांचा आयुष्यभर द्वेष केला. त्यांना एकत्र बोलवून त्यांच्या पत्रावळ्या उचलत आहात. काँग्रेसच्या पत्रावळ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सैनिक आणि पवारसाहेबांचा पक्ष करत आहेत.”
इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, “माझा २८पक्षांना सवाल आहे की लोकशाही वाचवायला एकत्र आलात की स्वतः च कुटुंब? ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ हा आता राष्ट्रीय खेळ आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. हे सर्व जण आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी खेळ खेळत आहेत. भाजप जनतेला वाचवण्यासाठी पुढे येत आहे. आमचा या २८ पक्षांना सवाल आहे की तुमचा नेता कोण? पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? यावर त्यांनी स्वत: उत्तर द्यावं असं देखील ते म्हणाले. तसंच, महाराष्ट्रात आमच्या ४५ पेक्षा जास्त जागा येणार यासाठी आम्ही कामाला लागलो आहे.”
आशिष शेलार यांनी ट्वीटमध्ये काय म्हंटले?
तर ट्वीट करत त्यांनी लिहिले की, “मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला. ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या. अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे.महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे…फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना…महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!”