नारायण सातपुते
रेठरे बुद्रुक – करोना महामारीपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी प्रशासन तसेच आरोग्य विभाग विविध माध्यमांतून जनजागृती करत आहेत. मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अनेक नागरिक करोनापासून वाचण्यासाठी नव्हे तर पाचशे रुपयांची पावती फाडायला लागू नये म्हणून मास्क फक्त सोबत बाळगत आहेत. तोंडावरच्या मास्कला हातातही न ठेवता चक्क गाडीच्या हॅंडेलला लटकावल्याचे प्रकार पहावयास मिळत आहेत.
मास्क ही शोभेची वस्तू नसून जीवघेण्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठीचे एक अत्यावश्यक साहित्य आहे, हेच नागरिकांना कळत नाही. करोना महामारीामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण देश या करोना महामारीशी लढा देत आहे. गत काही दिवसांपासून कराड तालुक्यात विविध गावात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.
ज्या गावात रुग्ण वाढत आहेत त्या गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. ज्यांना अजूनही करोना महामारीची झळ पोहचलेली नाही ते लोक मात्र, अजूनही बिनधास्तपणे वावरत आहेत. मास्कचा वापर फक्त दंडापासून वाचण्यासाठी केला जात आहे.
वर्दळीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे. गेले दोन महिन्यांपूर्वी करोनाची जी भीती लोकांमध्ये होती. ती लॉकडाऊन शिथील झाल्यापासून पहावयास मिळत नाही. करोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच या करोनाची भीती लोकांमधून कमी झाली असल्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. गत काही दिवसांपासून तोंडावरचा मास्क बहुतांशी लोक हातात अडकवून फिरत आहेत. तर काहीजण गाडी पार्क करताना जसे हेल्मेट गाडीला अडकवले जाते.
तसा हा मास्कही गाडीच्या हॅंडेलला अडकवून जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच शासनाच्यावतीने विविध करोना वॉरियर्स करोना प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. काही लोकांकडून शासन व आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन केले जात नाही.
काहीजण वापरलेले मास्क अस्ताव्यस्तपणे कुठेही कचरा टाकल्यासारखे, रस्त्याकडेला तसेच गावाबाहेर रस्त्यालगत झाडांच्या फांदीला हे मास्क लटकलेले पहावयास मिळत आहेत. हे अतिशय चुकीचे असून वापरलेल्या मास्कचीही योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. करोनापासून वाचायचे असेल तर करोनासोबत जगायला शिकणे काळाची गरज आहे, असे म्हणावे लागेल. त्यासाठी आरोग्य विभागाच्या सुचनेप्रमाणे आपली जीवनशैली बदलणे गरजेचे आहे.