शिरवळ -शिरवळ, खंडाळा, लोणंदसह तालुक्यात करोनाने कहर केला आहे. प्रशासनाने वेळीच घेतलेली काळजीमुळे करोनाचे संक्रमण थांबले होते. परंतु जनतेनेच अनलॉक सुरु केल्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या 79 झाली असून यामध्ये शिरवळ येथील 29 रुग्णांचा सामावेश आहे. दरम्यान, यामधून चार बाधित रुग्ण मृत झाल्याने जनजीवन भयभीत झाले आहे.
पुणे- मुंबईसारखी शहरे दळणवळणांच्या आधुनिक सोयींनी खंडाळा तालुक्यापासुन काही तासांच्या अंतरावर आहेत. त्यामुळेच तालुक्यातील जनतेची नाळ रोजगाराच्या निमित्ताने या भागाशी जोडली आहे. म्हणूनच चाकरमान्यांचा तालुक्यात वाढता वावर असतो. तीन महिन्यांपूर्वी करोनाचे संकट आल्यावर संसर्ग वेळीच थोपविण्यासाठी शासनाच्या वतीने लॉकडाऊनसारखा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला.
खंडाळा तालुकावासियांनीही या उदभवलेल्या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करीत करोनाला दूर ठेवण्यात यश मिळविले. परंतु, परदेशवारी करून आलेल्या महिलेच्या निमित्ताने पहिला बाधित रुग्ण खंडाळा शहरात आढळून आला. यावेळी प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेने होणारे संक्रमण वेळीच रोखण्यात यश आले. दरम्यान स्थानिक जनता नियमांचे पालन करीत घरीच थांबल्याने सुरक्षित राहिली. परंतु, करोनाच्या भीतीने शहरी भागातील चाकरमान्यांचा शिरवळ, लोणंद, खंडाळा या शहरी भागासह ग्रामीण भागाकडे वाढलेला वावर यामुळे हे संक्रमण कासव गतीने शिरकाव करू लागले.
करोना रुग्णसंख्येने तालुक्याचा सर्वच भाग व्यापून गेला. अशातच अर्थकारणाला गती देण्यासाठी शासनाने अटी आणि शर्तीचे पालन करीन उद्योगधंद्यांना परवानगी दिली. याचबरोबर जनसेवेसाठी म्हणत अनेक व्यवसाय सुरू करण्यात आले. अनलॉक जनतेने गांभीर्याने घेतला नाही. आता करोनाबरोबर जगावे लागेल हा संदेश समाजात वेगाने पसरला आणि करोनाचे संक्रमण गतीने होऊ लागले.
आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासनाने जनतेची केलेली जनजागृती आणि राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे संक्रमण साखळी तोडण्यात यश आले. हवालदिल झालेल्या जनतेला एक दिलासा मिळाला. परंतु, हा दिलासा लोकांच्या चुकांमुळे अगदी काहि दिवसांचाच ठरला. शिरवळसारख्या शहरात करोनाचे संक्रमण वाढत गेल्याने चिंता वाढली. कवठे,असवली, शिंदेवाडी, पळशी आदी परिसरांत रुग्णांची नोंद झाली. तर लोणंद आणि परिसरात 11 रुग्णांची वाढ झाली. याचबरोबर अहिरे आणि परिसरात 20 रुग्णांना करोनाची लागण झाली. हे गतीने हाणारे संक्रमण चिंताजनक झाले आहे.
औद्योगिक क्षेत्रात काळजी घेण्याची गरज
खंडाळा तालुक्यात करोनाचे संक्रमण अधिक गतीने होऊ लागले आहे. शासनाचे नियम पायदळी तुडवत जनता बिनधास्त वावरत करोनाला निमंत्रण देत आहे. अशा परिस्थितीमध्ये जनहितासाठी जनतेनेच आता जनता कर्फ्यू लागु करावा, अशी चर्चा लोक करीत आहेत. असे झाले तरच करोनाचे वाढते संक्रमण थोपविण्यात यश मिळेल असे मत व्यक्त होत आहे.
खंडाळा तालुक्याच्या औद्योगिकीकरणात असणारे बहुतांश कुशल कामगार परजिल्हयातील अथवा परप्रांतीय आहेत. तालुक्यातील अनेक कंपनीतील कामगारवर्गात करोनाचा फैलाव होऊ लागला असून हू स्थानिक जनतेसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यामुळे शासन निर्देशनाचे पालन करीत कामगार वर्गाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे ठरू लागले आहे.