दिवसभर थांबूनही मिळेना काम, रोजीरोटीचा प्रश्न गंभीर
महाळुंगे इंगळे -पुणे-नाशिक महामार्गावर येथील तळेगाव चौक व आंबेठाण चौक हा औद्योगिक क्षेत्रातील अवजड कामे, बांधकाम क्षेत्रातील कारागीर ते बिगारी, लग्न समारंभातील वाढपी, शेतमजूर, माल चढ- उतार करणारी मंडळी यांच्यासाठी हक्काचा मजूर अड्डा झाला आहे. दररोज दिवसभर कष्ट केल्यानंतर सायंकाळी पैसे घेणारे हे मजूर भाकरीच्या शोधासाठी दररोज नित्य नियमाने मजूर अड्ड्यावर सकाळीच मोठी गर्दी करीत असल्याचे दिसत आहे.
चाकण येथील या अड्डयांवर तरुण, तरुणी, महिला व पुरुष जमतात. यामध्ये 17 ते 18 या वयाची तरुणही दिसतात. काहींचे शिक्षण जेमतेम तर काही पदवीधर सुद्धा आहेत. जेवढ्या लवकर येणार त्यावर दिवसाची रोजंदारी मिळणार म्हणून अड्डयांवर येण्याची घाई या मजुरांना असते. दिवसाचे 400 ते 500 रुपये रोज मिळतात. काही जणांना तर दिवसभर थांबूनही काम मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यात रोजच काम मिळेल, याची काही शाश्वती नाही. त्यामुळे पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असते. सेंट्रिंग काम, घरगुती काम, खड्डे खोदायचे, पाणी भरायचंय, जागा सफाई, गवत कापणी आदी कामासाठी ही मजूर तयार असतात.
गावात नाही, तर शहरात तरी काम मिळेल या आशेने शहरात गावांकडून नागरिक कामाच्या शोधात येत आहेत. बांधकामासाठी मोठ्या संख्येने अगदी सहज मजूर मिळत आहेत. मजूर अड्डयामुळे ठेकेदार, उद्योजक, शेतकरी, मोठे बांधकाम व्यावसायिक यांच्यासह लग्न समारंभातील कारभाऱ्याचा आणि निवडणूक काळात चक्क उमेदवारांचा मनुष्यबळ सांभाळण्याचा किंवा ऐनवेळी शोधाशोध करण्याचा त्रास कमी झाला आहे.
परप्रांतीयांसह राज्यभरातून लोंढे दाखल
चाकण पंचक्रोशीतील अथवा स्थनिक कामगार उपलब्ध होत नसल्याने राज्यातील सातारा, बीड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, हिंगोली, औरंगाबाद, सोलापूर, सांगली आदी अनेक जिल्ह्यांसह उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आदी राज्यातील गवंडी, कारागीर, बिगारी असे मजूर येथे माफक दरात उपलब्ध होत आहेत. गरजे नुसार ठेकेदार कारागीत आणि मजुरांची निवड करून त्यांना रोजंदारीने कामासाठी घेऊन जातात.
सध्या बांधकाम क्षेत्रात काहीसे मंदीचे सावट असल्याने व औद्योगिक क्षेत्रातून फारशी नाका कामगारांची मागणी नसल्याने दररोज रोजगार मिळेलच याची शाश्वती नसते. मात्र काहीतरी काम मिळेल, पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने शेतीच्या कामांतून रोजगार उपलब्ध होईल, या आशेने हे मजूर दररोज न चुकता सकाळीच येथील मजूर अड्डयावर हजेरी लावत असल्याचे चित्र दिसत आहे.
चाकण येथील मजूर अड्डयावर सकाळी मजुरांची मोठी गर्दी होत असल्याने महामार्गावर वाहनांची कोंडी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हे संभाव्य धोके टाळण्यासाठी मजुरांसाठी वेगळ्या ठिकाणी मजूर अड्डा सुरू करणे आवश्यक आहे.
-दीपक ताटे, अध्यक्ष, भापसे पार्टी, चाकण