-राहुल गोखले
वार्षिक दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भाजपच्या खेळींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात आपल्या बाबतीत भाजपने जे केले ते तुमच्या बाबतीत होत नाही ना, याची खबरदारी घ्या, असा सल्ला ठाकरे यांनी नितीशकुमार यांना दिला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिलेल्या सल्ल्याचा अर्थ स्पष्ट आहे. सध्या जरी नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री असले आणि बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजप-संयुक्त जनता दल संबंध अबाधित असले तरीही निवडणूक निकालानंतर ते कायम राहतील का, असे प्रश्नचिन्ह ठाकरे यांनी लावले आहे. बहुधा स्वानुभवावरून त्यांनी हा किंतु उपस्थित केला असावा. पण ठाकरे यांचा हा सवाल अगदीच अस्थानी नाही हेही निर्विवाद. याचे कारण भाजपला सर्वत्र सत्तेची सूत्रे आपल्याच पक्षाकडे असावीत, असे प्रबळपणे वाटते आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राजकीय क्लृप्त्या देखील भाजप अलीकडच्या काळात करीत आला आहे. तेव्हा आता जरी नितीशकुमार हेच बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा चेहरा असले तरी निकालानंतर हेच चित्र राहील अशी शाश्वती कोणीही देणार नाही. शिवाय नितीशकुमार यांच्या कारभाराविषयी बिहारच्या जनतेत वाढती नाराजी असल्याने भाजपला तेथे सत्ता स्थापन करण्याची ती संधी वाटत असल्यास आश्चर्य वाटावयास नको.
भाजपच्या या दबावतंत्राची सुरुवात झाली ती मुळी जागावाटपापासून. निकालांमध्ये जर संयुक्त जनता दलाला भाजपपेक्षा काही जागा जरी कमी मिळाल्या तरी भाजपची मुख्यमंत्रिपदाची मागणी पुढे येऊ शकते. भाजपचे एकूण विस्तारवादाचे धोरण आणि मित्रपक्षांना देण्यात येणारी दुय्यम वागणूक हे पाहता गरज नसेल, तर संयुक्त जनता दलाला देखील सोडचिठ्ठी भाजपने बदलेल्या राजकीय परिस्थितीत दिली तर आश्चर्य वाटावयास नको.
पण यावेळी बहुधा नितीशकुमार यांना जेवढी भाजपची गरज आहे तेवढी भाजपला नितीशकुमार यांची नसावी आणि याचे कारण म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून लोक जनशक्ती पक्षाने बहिर्गमन करून मांडलेली वेगळी चूल. शिवाय रामविलास पासवान यांच्या निधनामुळे आता त्या पक्षाची सर्व सूत्रे चिराग पासवान यांच्याकडे आली आहेत. राजकरणात रामविलास जेवढे मुरब्बी होते तेवढा अनुभव चिराग यांच्याकडे नाही. तेही भाजपच्या पथ्यावर पडले तर नवल नाही. किंबहुना आतापासूनच चिराग यांनी सातत्याने नितीशकुमार यांना टीकेचे लक्ष्य करतानाच भाजपशी आपले भांडण नाही असा सूर लावला आहे. तो पुरेसा बोलका आहे कारण निकाल लागल्यानंतर जर भाजपला सत्ता स्थापन कारण्याइतक्या उण्यापुऱ्या जागा मिळाल्या आणि संयुक्त जनता दलाने मुख्यमंत्रिपद भाजपला देण्यास नकार दिला तर लोक जनशक्ती पक्ष मदतीला येईल याची चाचपणी यातून चिराग आणि भाजप करीत आहेत.
प्रचारात देखील चिराग नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका करीत आहेत. अर्थात ज्या अर्थी ते मोदी यांची प्रशंसा करतात त्याचा अर्थ निकालानंतर ते राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्याची शक्यता कमी आहे. केंद्रात भाजपची सत्ता असताना सत्तेचे काही शिंतोडे आपल्यावरही उडावेत म्हणून त्यांनी भाजपचीच साथ देण्याचा निर्णय घेतला तर ते राजकीय शहाणपणाचे लक्षण. हे सगळे पाहूनच आणि आपली राजकीय स्थिती फारशी समाधानकारक नाही याचा अदमास घेऊन नितीशकुमार यांनीही मोदी स्तुतीचा राग आळवायला प्रारंभ केला आहे.
हे तेच नितीशकुमार ज्यांनी मागच्या वेळी मोदी यांच्याशी एका व्यासपीठावर येण्यास नकार दिला होता आणि त्याअगोदर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नितीशकुमार यांनी मोदींना बिहारमध्ये रालोआच्या प्रचारास येण्यास देखील आडकाठी केली होती. आता मात्र नितीशकुमार हे मोदींनी प्रचारात दिलेल्या आश्वासनांकडे जनतेचे लक्ष वेधत आहेत आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले तर मोदी स्वतः लक्ष घालून बिहारचा विकास घडवून आणतील अशी शाश्वती देत आहेत.
बदललेल्या राजकीय परिस्थितीने नेते किती भूमिका-बदल करू शकतात याचे हे मूर्तिमंत उदाहरण. किंबहुना एवढ्यावरूनच नितीशकुमार पराभवाच्या छायेत आहेत का, अशी शंका येऊ शकते. एवढेच नव्हे तर भाजपशी सलोख्याचे संबंध ठेवले नाहीत आणि भाजपला चिराग पासवान यांच्या पक्षासह सत्ता मिळण्याची स्थिती निर्माण झाली, तर आपली सत्ता मात्र संपुष्टात येईल हे भय देखील त्यांना वाटत असावे. त्यांच्या बदललेल्या स्वरांचा तोच अन्वयार्थ निघू शकतो. त्यातून आत्मविश्वासाच्या अभावाचे आणि हताशपणाचे दर्शन घडते.
अर्थात राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस आणि डावे पक्ष यांच्या आघाडीला बहुमत मिळाले तर या सगळ्याच शक्यता संपुष्टात येतील आणि मग भाजप आणि संयुक्त जनता दलाला एकत्र राहण्यावाचून पर्याय राहणार नाही आणि तसे झाले तर चिराग यांच्या डावपेचांनाही यश येणार नाही. त्यांनी तूर्तास नितीशकुमार यांना विरोध पण भाजपची प्रशंसा असे दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याचे धोरण ठेवले आहे ते त्यामुळेच. तेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता गेलीच तर भाजप आणि संयुक्त जनता दलाची साथ कायम राहीलही. पण जर चिराग यांच्या पक्षाला काही जागा मिळाल्या आणि सत्ता मिळण्याचा थोडाही किरण दिसला तर भाजप नितीशकुमार यांची साथ सोडून चिराग यांची मदत घेईल का, हे कळण्यास फार अवधी शिल्लक नाही. पुढच्या दहा दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल आणि उद्धव ठाकरे यांनी नितीशकुमार यांना दिलेला सल्ला संयुक्तिक होता का, याचाही उलगडा होईल.