पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता. हे भारतातील कोणा नेत्याचे वक्तव्य नाही. आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही हे म्हटलेले नाही. सामान्यत: अशी विधाने आपल्याला यांच स्रोतांतून ऐकण्याची सवय आहे. मात्र पुलवामा हल्ल्यातील सहभागाची कबुली खुद्द पाकिस्तानी मंत्र्यानेच दिली आहे. फवाद चौधरी हे त्यांचे नाव. ते पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनीच संसदेत हे वक्तव्य केले आहे.
भारतातील दहशतवादी हल्ल्यांचे तार कुठेतरी पाकिस्तानात पोहोचलेले असतात याची सगळ्यांना कल्पना आहे. त्याचवेळी पाकिस्तान दहशतवादाच्या संदर्भातले आरोप सातत्याने नाकारत असतो. मात्र चौधरी यांनी आपल्याच देशाची आणि सरकारचीही नाचक्की केली. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली या आत्मघाती हल्ल्यासाठी हल्लेखोर तयार केला गेला. त्यात 40 जणांचा मृत्यू झाला अशी फुशारकी मारत त्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली.
पाकिस्तानला आपली लायकी माहिती आहे. त्यांच्या लष्कराला आणि नेत्यांनाही ती माहिती आहे. दहशतवाद्यांना फूस, आश्रय देत भारतावर सोडायचे हा त्यांच्या राष्ट्रीय धोरणाचा भाग आहे. समोरासमोर लढण्यापेक्षा त्यांना हे परवडते. प्रत्यक्ष युद्धात आपले बारा वाजतात याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे गेल्या काही दशकांत त्यांनी ही कार्यशैली स्वीकारली आहे. ते देश म्हणून स्वत: दहशतवाद्यांच्या मागे लपतात. त्यांच्याकडून भारतात घातपात घडवतात आणि स्वत: नामानिराळे राहतात. पुन्हा त्या दहशतवाद्यांच्या भाऊबंदांना आश्रयही देतात.
जगात सगळीकडे त्यांची याबाबत किर्ती पसरली आहे. त्यामुळेच अब्रू घालवणाऱ्या वेगवेगळ्या याद्यांत त्यांना स्थान प्राप्त आहे. त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांना मारले गेले आहे. तरीही आम्हाला काही माहितीच नाही असा त्यांचा पवित्रा. त्याच्या एकदम विपरीत घटना त्यांच्या संसदेत आता घडली. मंत्र्यानेच पाकिस्तानच्या सहभागाची कबुली द्यावी हे आश्चर्यच म्हणायचे. त्यांच्या विधानावर ना कोणी नेता रिऍक्ट झाला ना तेथील माध्यमे. नाही म्हणायला फवाद चौधरीचा पूर्वेतिहास पाहता सोशल मीडियावर त्यांची यथेच्छ टवाळी होते. पण कालच्या प्रतापाबद्दल सगळीकडे चीडीचूप. ज्याचे पितृत्व इतके वर्षे कसोशीने नाकारले ते दहशतवादाचे अपत्य आपलेच असल्याची जाहीर कबुली द्यावी हा सगळा उलटा प्रवासच म्हणायचा. त्यामुळे बहुदा तिकडचे सगळे चौधरींच्या प्रतापाने ग्लानीत गेले असावेत. त्यांनी मौन बाळगले. मात्र भारतातल्या काही उतावळ्यांनी थोडा धीर धरला नाही. त्यांनी लगोलग चौधरींशी संपर्क प्रस्थापित करून त्यांना खुलासा करण्याची संधीही देऊन टाकली. त्यामुळेच चौधरींना यू टर्न घेता आला.
आपल्या बोलण्याचा भारतीय मीडियाने चुकीचा अर्थ काढला, असे सांगतानाच त्यांनी हे सगळे प्रकरण कुलभूषण जाधव यांच्यापर्यंत नेऊन ठेवले. भारतीय माध्यमांचा हाच उतावळेपणा 2008 च्या मुंबई हल्ल्याच्याही वेळी नडला होता. थेट प्रसारण करण्याच्या नादात बावळटासारखी सगळी सज्जता आणि मोहिमेची तयारी ते शत्रूला घरबसल्या ताटात वाढून देत होते. भान नसलेल्यांची ही गर्दी. असो. चौधरी यांनी संबंधित विधान का केले, हाही एक प्रश्न आहे. अर्थात, त्याचे उत्तरही फारसे किचकट नाही. नवाज शरीफ यांच्या पक्षाचे एक नेते आहेत, सरदार अयाझ सादिक. त्यांनी पाकिस्तान सरकारचे पुरते वस्त्रहरण केले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात बालकोट येथे असलेले जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले होते. या अनपेक्षित हल्ल्याने पाक गांगरला होता. भारताने दुसऱ्यांदा त्यांच्या हद्दीत घुसून त्यांचे नाक कापले होते. त्यांच्या लष्कराला स्वत:ची प्रतिष्ठा जपणे क्रमप्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी आपली विमाने घुसवून प्रतिक्रिया नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र सज्ज भारतीय हवाई दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावले. पाकिस्तानचे एक विमान पाडल्यानंतर भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात सापडले होते. त्यांची सुटका केली नाही तर भारत थेट हल्ला करणार अशी भीती पाकिस्तानच्या नेत्यांच्या मनात बसली होती. या विषयावर चर्चेसाठी उच्चस्तरिय बैठक झाली होती. तेव्हा पाकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह महमूद कुरेशी आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा लटलट कापत होते. असा घरचा आहेरच सादिक यांनी दिला होता.
इम्रान खान सरकार घाबरट आहे, हेच त्यांना ठसवायचे होते. सरकारला लक्ष्य करणे मोठी गोष्ट नाही. मात्र यंदा प्रथमच सगळे विरोधक एकत्रितपणे पाकिस्तानी लष्करावर तुटून पडले आहेत. टीकेची लडच त्यांनी लावली आहे. सादीक यांनी तर बॉम्बच फोडला होता. त्यामुळे जेरिस आलेल्या सरकारने बहुदा लष्कराच्या सांगण्यावरून फवाद चौधरी यांच्याकडे फुशारकी मारण्याची जबाबदारी सोपवली असावी. सगळीकडे असतात त्याप्रमाणे तिथल्या राजकीय पक्षांतही हेवेदावे, दुही आहे. पण भारत विरोध ही त्यांची व्होट बॅंक असल्यामुळे या विषयावर ते एकवटतात. त्यामुळेच चौधरींनी पुलवामाचा विषय उपस्थित करून पाठ थोपटून घेतली. आंतरराष्ट्रीय पटलावर याचे पडसाद उमटणार याची पाक सरकारला कल्पना नसेल इतके ते मूर्ख नाहीत. मात्र थोडी किरकिर होण्यापलिकडे त्यातून फार निष्पन्न होत नाही हे त्यांनाही अंगवळणी पडले आहे.
दहशतवादाचा आश्रयदाता म्हणवून घेण्याचेही त्यांना फार वैषम्य नसते. नॉन स्टेट प्लेअर लोकांचे कारस्थान असल्याचे नमूद करत त्यांनी प्रत्येक दहशतवादी हल्ल्याच्या आरोपाची बोळवण केली आहे. पण थेट इम्रान यांच्या नेतृत्वाखाली तयारी करण्यात आल्याचे सांगत मंत्र्यानेच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रकार धक्कादायक होता. सध्या पाकिस्तान एफएटीएच्या यादीत आहे. इतरही काही निर्बंध आहेत. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या यादीत नोंद आणि हजेरी लागली की वेगवेगळ्या रसद बंद होतात. पाकला सध्या ते नको होते. भावनेच्या भरात किंवा फुशारकी मारण्याच्या नादात त्यांच्याकडून कबुली दिली गेली. या घटनाक्रमानंतर खरेतर सगळ्यांनी गप्प राहणे आणि त्याचे गांभीर्य जागतिक स्तरावर खोलवर झिरपू देणे आवश्यक होते.
भारताकडून अधिकृतपणे कोणती प्रतिक्रिया तातडीने दिली गेली नाही ती यासाठीच. मात्र “सबसे तेज’चा किडा डोक्यात गेलेल्या माध्यमांना याची फिकीर काय? फवाद चौधरींशी संपर्क साधून त्यांनाच आपल्या कबुलीजबाबात दुरुस्ती करण्याची संधी तर दिलीच गेली, उलट भारतावर नवे चार आरोप करण्याचीही सोय या माध्यमांनी उपलब्ध करून दिली. देशांतर्गत मुद्द्यावर न्यायाधीशांच्या पवित्र्यात प्रश्नांच्या फैरी झाडणाऱ्या आणि आक्रमक पवित्रा घेणाऱ्या कथित पत्रकारांना चौधरींशी बोलताना कंठ का फुटत नव्हता हाही चकित करणारा विषय आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अशा घटनांच्या थेट प्रसारणावर काही अंकुश लावण्यात आले आहेत. तद्वतच संवेदनशील विषयांवर कुठे तोंड उघडायचे आणि केव्हा बंद ठेवायचे याचे स्वयंनियमनही संबंधित माध्यमांनी करणे आवश्यक आहे. अन्यथा उतावळ्यांच्या गर्दीत हातात आलेलेही निसटून जाते.