नवी दिल्ली: पाकिस्तानकडून पुलवामा हल्ला घडवून आणल्याचे मान्य केल्यानंतर भाजपने आता विरोधी पक्षाचा चांगलाच समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. पुलवामा हल्ला सरकारनेच घडवून आणला असेल असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र आता पाकिस्तानने स्वतः याची कबुली दिली आहे त्यामुळे सरकारवर आरोप करणाऱ्यांना आता भरचौकात जोड्याने बडवले पाहिजे, असा घणाघाती हल्ला परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के. सिंह यांनी चढवला आहे.
पुलवामा हल्ला सरकारनेच घडवून आणला आहे, अशा वल्गना करण्यात आल्या. याच पक्षाने भगवा दहशतवादाचा उल्लेख केला होता. अशा लोकांना उघड्यावर जोड्याने बडवले पाहिजे, असे व्ही.के. सिंह म्हणाले. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवाल होता.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी तर या हल्ल्यामागे मोदी सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी सरकारने हा हल्ला घडवून आणला असल्यचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच बालकोट हल्ल्याच्या पुराव्याची चौकशी करण्यासाठी आणि या हल्ल्याची माहिती मिळावी म्हणून एका संयुक्त राष्ट्र समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
दरम्यान, पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानी संसदेत भारतात झालेल्या पुलवामा हल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे कबूल केले आहे. पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इमरान खान यांच्या नेतृत्वातील सरकारचे यश असल्याचे चौधरींनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये म्हटले होते. पाकिस्तानला पंतप्रधान इमरान खान यांच्याबद्दल आदर असला पाहिजे कारण आपल्या देशाने भारताच्या भागात घुसून त्यांच्यावर हल्ला केला आहे, असं फवाद चौधरी या मंत्र्याने म्हटले आहे.