पुणे – स्थानिक कांद्याचे भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बंदरावर इराणमधील कांदा दाखल झाला आहे. एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला असताना परदेशातून कांदा आयात करण्याचे धोरण अवलंबवले आहे. कांद्याचे भाव कमी करण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगणात येत आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांत कांद्याच्या भावात सुमारे वीस रुपयांनी भावात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याला प्रतिकिलो 85 रुपये भाव काही दिवसांपूर्वी मिळाला होता. तो आता 65 रुपयांवर आला आहे. मुंबईतील वाशी बाजार समितीच्या आवारात इराणमधील कांदा विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती तेथील व्यापाऱ्यांनी दिल्याचे मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
मार्केटयार्डात रविवारी 60 ट्रक कांद्याची आवक झाली. त्यात 40 ते 45 ट्रक जुना कांदा आहे. मध्यप्रदेशातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. तेथून 10 ट्रक नवीन कांद्याची आवक झाली. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा परिसरातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. स्थानिक कांदा भिजलेला असला, तरी मध्यप्रदेशातील कांद्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील नवीन कांद्याची प्रतवारी चांगली आहे.
घाऊक बाजारात प्रतवारीनुसार दहा किलोस 550 ते 650 रुपये भाव मिळाले. मध्यप्रदेशातील दहा किलो कांद्याला 150 ते 300 रुपये भाव मिळाला. महाराष्ट्रातील स्थानिक नवीन कांद्याला 150 ते 300 रुपये भाव मिळालेले आहेत, असे पोमण यांनी सांगितले.