नवी दिल्ली, दि.27 -बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ एनडीएच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल. विरोधकांच्या महाआघाडीला दोन-तृतीयांश बहुमत मिळणे निश्चित आहे. मतमोजणीच्या दिवशी (10 नोव्हेंबर) बिहारमध्ये नवी पहाट उगवेल, असा भाकितवजा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी केला.
महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सत्ताबदलाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. मी कुठला ज्योतिषी नाही. मात्र, प्रचारावेळी आम्हाला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे जनतेने महाआघाडीवर मोठी जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सूचित होत आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सत्तेच्या हव्यासाला बिहारची जनता विटली आहे. करोना संकटकाळात बेरोजगार, स्थलांतरित आणि गरिबांना मिळालेल्या भेदभावाच्या वागणुकीमुळे जनतेत संतापाची भावना आहे. नितीश यांनी बिहारला उद्धवस्त केल्याची जाणीव आता जनतेला झाली आहे. त्यामुळे सत्ताबदल अटळ आहे, असा दावा त्यांनी केला.
नितीश यांच्या 15 वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत बिहारमध्ये रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग या महत्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष केले गेले. महाआघाडीला सत्ता मिळाल्यास त्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवले जाईल. जनतेच्या समस्या डोळ्यांसमोर ठेऊन आणि वास्तवातील मुद्दे पुढे करून आम्ही प्रचार करत आहोत. त्यामुळे महाआघाडीला ऐतिहासिक कौल मिळेल, असा विश्वास तेजस्वी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा आणि तिसरी आघाडी रिंगणात असल्याचा महाआघाडीच्या चांगल्या कामगिरीवर कुठला परिणाम होणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.