संकटकाळी मिळेल त्वरित मदत ः पेठमध्ये एक दिवसीय कार्यशाळा
पेठ (वार्ताहर)- पेठ (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत एक दिवसीय कार्यशाळा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार घेण्यात आली. आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास एकाच वेळी अनेक जणांशी संपर्क साधला जाईल. त्यातून इतरांना सावध करता येईल, तसेच मदतीसाठी बोलता येईल. ही यंत्रणा ग्रामपंचायतमार्फत राबवली जाणार असून, या यंत्रणेमुळे गुन्हेगारी घटनांना आळा बसू शकेल आणि पोलीस प्रशासनाला त्याचा फायदा होईल, अशी माहिती प्रात्यक्षिकाद्वारे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे यांनी दिली.
यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के गोरडे, पीएसआय अर्जुन शिंदे, पोलीस नाईक विनोद गायकवाड, सातगाव पठार बीट अंमलदार कैलास कंड, उपसरपंच अनिल सणस, ग्रामसेवक एम. जे. चौगुले, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ नवले, जयसिंग एरंडे, दिलीप पवळे अशोक राक्षे, सुदाम काळे, उमेश कंधारे आणि नागरिक उपस्थित होते.
यंत्रणेचे फायदे
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रमुख फायदा म्हणजे घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची मदत मिळू शकते. प्रशासनाला नागरिकांशी जलदरित्या संवाद साधता येतो. या यंत्रणेचा फायदा पोलीस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्था राखणेकामी निश्चितच मिळणार आहे. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतोणमंचर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेला लाभले.
कॉल 25 सेकंदांपर्यंतचाच असावा
ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्यासाठी या यंत्रणेमध्ये गावात कोणतेही मशीन लावण्यात येत नाही किंवा नागरिकांना कोणत्याही मोबाइल ऍपचा वापर करावा लागत नाही. संकटकाळात परिसरातील नागरिकांना सावध करणे किंवा त्यांची मदत मागण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यावर संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित आहे. हा कॉल 25 सेकंदापेक्षा मोठा नसावा. कॉल करताना स्वतःचे नाव, घटनेचे ठिकाण, घटनेचे स्वरूप स्पष्ट शब्दांमध्ये व नागरिकांना समजेल अशा पद्धतीने सांगावे. कॉल करण्याअगोदर शब्दरचना शक्यतो एका कागदावर लिहून घ्यावी आणि मगच कॉल करावा.
चोरी, दरोडे, महिलांसंदर्भातील गुन्हे, लहान मुले हरवणे, वाहनचोरी, गंभीर अपघात , वन्य प्राण्यांचा हल्ला, जळीताची घटना, सर्पदंश इत्यादी घटनांमध्ये ग्रामसुरक्षा वापरामुळे तातडीने मदत मिळणे आणि दुर्घटनेला आळा घालणे प्रभावीपणे शक्य होणार आहे. नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे.
डी. के. गोरडे, संचालक, ग्रामसुरक्षा यंत्रणा