श्रीगोंदा -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांकडे दसऱ्याच्या मुहूर्तावर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला होता. मात्र, ज्यादा आवक दिसल्याने व्यापाऱ्यांनी कापसाला कवडीमोल भाव दिल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली. शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करत आंदोलनाल केले.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये कमी दर देत कापूस खरेदी केली जात आहे. शासनाचा हमीभाव 5515 ते 5825 रुपये असतानाही गेल्या आठ दिवसांपासून केवळ 4,000 ते 4,500 रुपये क्विंटलप्रमाणे कापूस खरेदी होत असताना दसऱ्याच्या दिवशी ज्यादा आवक झाल्याने अचानक व्यापाऱ्यांनी 3,500 रुपये भाव देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी संतप्त होत बाजार समितीचे गेट बंद करून आंदोलनाला सुरुवात केली. काही शेतकरी नेते व शेतकऱ्यांनी हमीभावाप्रमाणे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन घेतल्याने आंदोलन मागे घेतले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव फौजफाटा घेऊन दाखल झाले. समितीचे अध्यक्ष संजय जामदार व उपाध्यक्ष संजय महांडूळे हे देखील हजर झाले होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी देशाचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी सत्यस्थिती सांगितल्याने मांडे यांना 15 दिवसात हमीभाव केंद्र सुरु करण्याचे आश्वासन दिले. पटेल यांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, समितीचे अध्यक्ष संजय जामदार व सचिव दिलीप डेबरे यांच्याशी चर्चा करून हमीभाव केंद्राचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले व पंधरा दिवसांच्या आत हमीभाव केंद्रास मान्यता देण्याचे आश्वासन दिले.