नगर – करोनाच्या संकटामुळे आठ महिन्यांपासून लॉन्स मंगल कार्यालयातील कार्यक्रमांवर बंधने आलीत. टेन्ट, मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, डिजे, साऊंड, लाईट, डेकोरेटर, इव्हेंट, फोटोग्राफर, बगीवाले, आर्केस्ट कलावंत, आचारी, भटजी आदी घटकांतील काम करणारी माणसं त्यावर अवलंबून आहेत. तथापि, केवळ 50 माणसांच्या उपस्थितीची परवानगी असल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आली असल्याची भावना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे यांनी व्यक्त केली.
उपस्थितीची मर्यादा किमान 500 पर्यंत वाढवावी किंवा कार्यालय, लॉन्स, हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली. वेळोवेळी आंदोलने केली. निवेदने दिली.
परंतु त्यावर अजुनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता 2 नोव्हेंबर रोजीच्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मेहेत्रे यांनी केले.
ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन नवी दिल्ली संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशनच्यावतीने देशातील सर्वच शाखांची ऑनलाइन पद्धतीने अलिकडेच बैठक झाली. त्यात येत्या 2 नोव्हेंबरला राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या आंदोलनच्या नियोजनासाठी नगर जिल्ह्यातील व्यवसायिकांची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस उपाध्यक्ष पोपट राऊत, रघुनाथ चौरे, बबनराव म्हस्के, सचिव सौरभ तरटे, बाळासाहेब लगे, कार्याध्यक्ष समीर शेख, शहराध्यक्ष पंडितराव खरपुडे, राजेंद्र बोरुडे, राजेंद्र उईके, केटरिंग असोसिएशनचे राजेंद्र उदागे, साऊंड असोसिएशनचे शिवदत्त पांढरे आदि उपस्थित होते. पंडित खरपुडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यात लाखो लोकांचा रोजगार ठप्प झालेला आहे. टप्प्याटप्याने शासनाने सर्व गोष्टी सुरु केल्या आहेत. परंतु मंगल कार्यास फक्त 50 लोकांच्या उपस्थितीची अट अजूनही कायम आहे. ती रद्द करुन 500 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी द्यावी. त्यातून या व्यवसायातील विविध घटकांचा रोजगार पुर्ववत सुरु होईल, असे ते म्हणाले.