पावसाळी वातावरण : हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार?
पवनानगर – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र वातावरणातील बदलामुळे पुन्हा “पावसाळी’ वातावरण निर्माण झाली आहे. हवामानातील बदलाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे.
भातपिकांसह अनेक पीक ही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परतीच्या मार्गावर असलेला मान्सून आता पुन्हा बरसत आहे. मावळ तालुका भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पीक घेतले जाते.
यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे भातपीक चांगले आले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पवनमावळसह मावळ तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. कापणीला आलेल्या पिकांवर हे मोठं संकट उभे राहिले आहे.
हवामानातील बदलामुळे भात कापणी ही रखडली आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची चिंता भात उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.तर पवमावळातील शिवली, कोथुर्णे, येलघोल यासह अन्य गावांत काही शेतकऱ्यांना भातपिकाची कापणी केली आहे. एक महिन्यापूर्वी करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यात आता हवामानातील बदलामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.