नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील पुरवठा परिस्थितीवर परिणाम होऊ नये यासाठी तांदूळ, गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सध्याची एकूण परिस्थिती पाहता ही बंदी उठवण्याची कसलीही गरज सरकारला वाटत नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
गोयल यांनी हेही स्पष्ट केले की, सध्याची एकूण परिस्थिती पाहता भारताला गहू आणि साखर आयात करण्याची गरज भासणार नाही. भारताने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तर जुलैमध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू असलेली साखरेच्या निर्यातीवरील बंदी वाढविली आहे.
देशातील पुरवठा परिस्थितीवर परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने या उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे या वस्तूची भारतातील उपलब्धता वाढली आहे. त्याचबरोबर या वस्तूच्या किमती नियंत्रणात आहेत, असे त्यांनी सांगितले.