10 ऑक्टोबरपर्यंत लागणार : इयत्ता पाचवी, आठवीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 16 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षेचा अंतरिम निकाल 10 ऑक्टोबरपर्यंत लावण्यात येणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 9 लाख 71 हजार 764 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यात इयत्ता पाचवीच्या 5 लाख 74 हजार 372 तर इयत्ता आठवीच्या 3 लाख 97 हजार 392 विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरवर्षी जून मध्ये या परीक्षेचा निकाल लागतो. यंदा मात्र या निकालाला तब्बल साडेतील महिने विलंब झाला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सतत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. कार्यालयातही अधिकारी, कर्मचारी रोटेशन पद्धतीने उपस्थित राहात होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याने कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आलेली आहे. परीक्षेचे कामकाज करणाऱ्या एजन्सीचे कर्मचारीही महाराष्ट्राच्या बाहेरील असल्याने ते आपापल्या गावी अडकले होते. त्यामुळे काही महिने परीक्षेच्या निकालाचे काम मंदावले होते.
मागच्या महिन्यापासून संबंधित कर्मचारी कार्यालयात परतले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला आहे. आता, सर्व उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. केंद्र संचालकाकडून कळविण्यात आलेल्या त्रुटींचीही तपासणी पूर्ण होत आलेली आहे. विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यात आलेले आहेत. त्याची तपासणीही करण्यात आली आहे.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षांचे निकाल लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. तो विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत. त्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर अखेर परीक्षेची गुणवत्ता याची जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.