नगर -शहरातील बहुतेक भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्याचा नगरकरांची खूप त्रास सहन केला आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती सुरु करावी. तसेच सध्या सुरु असलेल्या रस्त्यांच्या साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा होणार नाही, याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. अन्यथा आता कामचुकारपणा करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी आमदार संग्राम जगताप यांनी आज दिली.
मागील आठवडयात शहरातील विविध प्रश्नासंदर्भात महापालिकेचे अधिकारी, अभियंते व विभागप्रमुखासह मॅरेथॉन बैठक घेण्यात आली होती. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह साफसफाई, रस्त्याच्याकडेला दगड-गोटे, गवत काढणे आदी कामांसंदर्भात आदेश देण्यात आले होते. पावसाची उघडीप होताच ही कामे तत्काळ सुरु करण्याचे बैठकीत ठरले होते. त्यानुसार आज सुरु झालेल्या साफसफाईसह अन्य कामांची आमदार जगताप व महापौ वाकळे यांनी एकत्रित पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कामासंदर्भात तंबी दिली.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह रस्त्यांचे मजबुतीकरण, खडीकरण करण्याचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. गंगा उदयान रोडवरील कामाची पाहणी आज करण्यात आली. नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय ढोणे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, अमित खामकर, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. नरसिंह पैठणकर, विद्युत विभागप्रमुख राजेंद्र मेहेत्रे, अभिजीत चिप्पा, पुष्कर कुलकर्णी, गोरख पडोळे आदी यावेळी उपस्थित होते. वाकळे म्हणाले, “”यावर्षी अतिरिक्त पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर जास्त खड्डे पडले. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला परंतु, उघडीप होताच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येईल. राज्य महामार्गांवरील खड्डेही बुजविण्याचे काम बांधकाम विभाग लवकरच सुरू करणार आहे.”