- करोनाशी संघर्ष करताना देवदासींना दिसला प्रकाशाचा मार्ग
- अन्य व्यवसायांसाठी प्रयत्न.., पण, कागदपत्रांचा प्रश्न
- मुलांचाही प्रश्न मोठा
– कल्याणी फडके (प्रतिनिधी)
पुणे – साथरोग आणि सामाजिक संकटांचा सर्वाधिक फटका हा नेहमी शोषित वर्गांनाच सर्वाधिक बसतो, हा जणू अलिखित नियम. पुण्यातील बुधवार पेठेत शरीर विक्रय करणाऱ्या महिलाही करोनाच्या साथीत याला अपवाद ठरल्या नाहीत. बहुतांश (सुमारे 70 टक्के) आपल्या गावी परतल्या. मात्र, ज्यांच्याकडे परतीचे मार्ग नव्हते, त्यांचा जगण्याचा लढा सुरूच राहिला. त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे आणि या व्यवसायातून बाहेर पडावे, यासाठी सामाजिक संस्थांचे उपक्रम सुरूच आहेत. त्याला आता मदतीची गरज आहे ती शासन स्तरावरची.
मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाले अन् या अंधाऱ्या गल्ल्याही सुनसान झाल्या. ग्राहक येत नव्हते आणि या महिलांना बाहेर जाता येत नव्हते. किंबहुना त्याही जीवाच्या भीतीने बाहेर पडत नव्हत्या. त्यामुळे या महिलांना करोनाची लागण फारशी झालीच नाही. जीवाच्या या संकटातून त्या वाचल्या, तरी पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी काही सामाजिक संस्था त्यांच्या मदतीसाठी धावल्या.
“रेड लाइट’ परिसरात महिलांनी विविध उपाययोजना केल्या. पोलीस आणि सरकारी यंत्रणांनी समाजसेवी संस्थांमार्फत त्यांना जेवणा-खाण्याची सोय केली. पण, आता या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. ब्युटी पार्लर, पिशव्यांची निर्मिती, शिवणकाम आणि किरकोळ व्यवसायासाठी त्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे या भागातील विजया (नाव बदलले आहे) या महिलेने सांगितले.
अन्य व्यवसायांसाठी प्रयत्न.., पण, कागदपत्रांचा प्रश्न
काही महिला पानटपरी, भाजी व्यवसाय, दागिने विक्री आदी व्यवसाय करतात. मात्र, त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. यापूर्वी शासनाच्या योजनांतर्गत येथील महिलांना ब्युटीपार्लर, शिवणकाम अशा कौशल्यांचे प्रशिक्षण दिले होते. नगरी उपजीविका अभियानांतर्गत महिलांना कर्ज मिळू शकते. मात्र, त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा अभाव हा मोठा प्रश्न आहे. बॅंकांमध्ये कर्जासाठी अर्ज केल्यास अनेकदा महिलांकडे वीज बिल, उत्पन्नाचे दाखले आदी कागदपत्रेच नसल्याने त्यांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होऊ शकत नाही.
मुलांचाही प्रश्न मोठा
शरीर विक्रय करणाऱ्या महिलांना सामाजिक संस्था मदत करत आहेत. केवळ त्यांनाच नव्हे तर, त्यांच्या मुलांचा प्रश्नही तेवढाच गहन आहे. जीवनावश्यक वस्तू सामाजिक संस्था महिलांपर्यंत पोहोचवत आहेत. मात्र, त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे आता महिलांना आर्थिक मदत सरकारकडून होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे “सहेली’ संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये या महिला आणि त्यांच्या मुलांमध्ये जागृती केली. धान्याचे किटवाटप केले. आमचा दवाखाना सुरू होता. मुलांना पौष्टिक नाष्टा देत आहोत. सध्या या मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. मुलांचा अभ्यास घेणे, इंटरनेटद्वारे शाळांना “कनेक्ट’ करणे आदी कामे सुरू आहेत. दवाखान्यातून संस्थेच्या वतीने समुपदेशन केले जाते. पुनर्वसनासाठी आम्ही त्या महिलांची मानसिकता तयार करतो. अशा महिलांचे प्रमाण कमी आहे. पण सुरुवात तर झाली आहे.
– देवयानी गोंगले, वंचित विकास संस्था
बुधवार पेठेतील “रेड लाइट’ परिसरात सध्या वर्दळ नाही. शरीर विक्रय करणाऱ्या महिलांसह ग्राहकांमध्येही करोनाची भीती आहे. महिलांनी योग्य काळजी घेतल्याने या परिसरात करोनाबाधितांची संख्या अत्यल्प आहे. पोलीस, पालिका, सामाजिक संस्था या महिलांना मदत करत आहेत. या व्यवसायातून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना पुनर्वसनासाठी विविध यंत्रणांद्वारे मदत करण्यात येत आहे.
– अलका गुजनाळ, समूह संघटक, समाज विकास विभाग, पुणे मनपा