नगर -बहुचर्चित महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मनोज कोतकर यांची आज बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांनी आज माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी निश्चित असलेले उमेदवार मनोज कोतकर यांनी काल अचानक भाजपला “जय श्रीराम’ करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती बांधले.
त्यांना पक्षातर्फे लगेचच सभापतिपदाची उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत सरळ लढत होईल, असे चित्र स्पष्ट झाले होते. ही राष्ट्रवादीची खेळी असून, भाजप व राष्ट्रवादी एकच असल्याचे दावे करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला टक्कर देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. मात्र, आज सकाळी थेट मातोश्रीवरुनच उमेदवारी मागे घेण्याबाबत आदेश आल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे अवसान गळाले. नेत्यांच्या आदेशामुळे पंक्चर झालेले स्थानिक नेते अचानच राज्यातील समीकरणांचा दाखल देत उमेदवारी मागे घेतल्याचे सांगत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही प्रक्रिया झाली. शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेल्या मनोज कोतकर यांनी सभापतिपदावर निवड झाल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी घोषित केले. महापालिकेचे प्रभारी नगरसचिव एस. बी. तडवी यांनी निवड प्रक्रियेत तांत्रिक सहकार्य केले. सभापती निवडीसाठी ऑनलाइन पद्धतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते.
काय घडले पडद्याआड?
शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. सत्तेच्या या सूत्राच्या नेमकी उलटी परिस्थिती नगरमध्ये होती. मात्र, आता सभापतीशिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. सत्तेच्या या सूत्राच्या नेमकी उलटी परिस्थिती नगरमध्ये होती. मात्र, आता सभापती
निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत सामना रंगणार, असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे राज्यातील समीकरणानुसार हा वाद मिटवून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची दिलजमाई करण्यासाठी शिवसेना उपनेते तथा जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी पुढाकार घेतला. आमदार संग्राम जगताप यांच्याशी त्यांची प्राथमिक चर्चा झाली. गडाख यांनी नगरच्या स्थितीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली. आमदार संग्राम जगताप यांनीही या निवडणुकीबाबत अगोदरच ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिली होती. त्यामुळे पवार यांनी थेट ठाकरे यांच्याशी संपर्क करुन शिवसेना व राष्ट्रवादीमधील कटुता मिटविण्यासाठी चर्चा केली. आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप यांनीही त्यास सहमती दर्शविली. त्यानुसार शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर व जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासंदर्भातील हालचाली पूर्ण केल्या. त्यानुसार आज शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांनी सभापतिपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेत ही कटुता संपविण्याच्या दिशेने एक पाऊल टाकल्याचे सांगितले जात आहे. आगामी महापौरपदाच्या निवडणुकीत आता राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना एकत्र असतील, असाही निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पुढील राजकारणात आता राष्ट्रवादी पुन्हा भाजपच्या विरोधात दिसेल, असे मानले जात आहे.