मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता याप्रकरणी बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधित असलेल्या भारतीय जनता पार्टी -बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग्ज कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरव्दारे विचारला आहे.
यावेळी त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? असा सवाल विचारला आहे. यासंबंधी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणतात, भारतीय जनता पार्टीचे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला आम्ही दुर्लक्ष करु देणार नाही. एका 59 ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र, याचवेळी कर्नाटकमध्ये भाजप कार्यकर्ता चंद्रकांत चव्हाण याला 1200 किलो गांजासह पकडण्यात आले. या प्रकरणाकडे एनसीबीने ढुंकुंनही पाहिले नाही.”
पुढे ते म्हणतात, कर्नाटकातील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सँडलवूड ड्रग्ज रॅकेट समोर आले आहे. यामध्ये अभिनेत्री रागिनी द्विवेदी हीला प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात आणखी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीला सुध्दा अटक करण्यात आली. अल्वा हा गुजरात भारतीय जनता पार्टीचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेहूणा आहे. विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीपसिंहबरोबर सहनिर्माता आहे. या बोयोपिकमध्ये मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. विवेक हा संदीपसिंहच्या निर्मिती कंपनीत पार्टनर आहे,” अशीही माहिती सचिन सावंत यांनी दिली.
पुढे सचिन सावंत म्हणाले, गुजरात राज्य सरकारने संदिप आणि विवेकच्या कंपनीबरोबर 177 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. याच संदिप सिंहने महाराष्ट्रातील भाजप कार्यालयात 53 वेळा फोन कोणाला केले, कोणत्या नेत्याला केले होते आणि संदिप सिंहला मॉरिशसमध्ये एका प्रकरणात कोणी मदत केली होती याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहे. महाराष्ट्र सरकारने या संबंधाची माहिती सीबीआयला दिलेली आहे. परंतु आजपर्यंत या ड्रग्स अँगलचा तपास का केला नाही?” असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे त्यांनी कंगना रणौत प्रकरणावरून एनसीबीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात एनसीबी व्हॉट्सअप चॅट मॅसेजवरून चौकशीसाठी बोलावत असेल, गुन्हा दाखल करत असेल तर
ड्रग कनेक्शन प्रकरणात कंगनाची चौकशी का नाही?
एनसीबीच्या ड्रग्ज कनेक्शन चौकशीतून कंगना रनौत गायबच आहे. कंगणाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हिडीओ हा पुरावा आहे. आपण ड्रग्ज घेत होतो असे तिने स्वतः कबुल केले आहे. असं असताना तिची चौकशी का केली जात नाही. एनसीबी व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीसाठी बोलावत असेल तर कंगनाच्या व्हिडिओकडे डोळेझाक का?”, असे अनेक प्रश्न देखील सचिन सांवत यांनी उपस्थित केले आहेत. तसेच या सर्व उपस्थित प्रश्नांची उत्तरे आता एनसीबीनी दिली पाहिजेत अस म्हणताना, एनसीबी कोणाला वाचवण्यासाठी तपास करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशारा देखील सावंत यांनी दिला आहे.