नागपूर – शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. ते लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राने मंजुरी दिलेल्या कृषी विधेयकाला मुळात शेतकऱ्यांचा या विधेयकांना विरोध नाही. त्यांनी तर स्वागतच केले आहे. मात्र काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019चा आपल्या स्वत:च्याच कॉंग्रेस पक्षाचा वचननामा पाहिला, तर त्यांनी या विधेयकाला विरोध केला नसता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
काल जी विधेयके राज्यसभेने मंजूर केली, ती ऐतिहासिक आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती करणारी आहेत. यामुळे आता “एक देश, एक बाजार’ शक्य होणार आहे. शेतकऱ्याने आपला माल कुठे विकायचा, याची मुभा त्याला मिळणार आहे.
या विधेयकामुळे आंतरराज्यीय विक्री सोपी होणार आहे. आपण राज्यात जेव्हा असा कायदा केला, तेव्हा मोठ्या प्रमाणात बाजारांची निर्मिती आणि तेथे शेतकरी थेट विक्री करतो आहे, हे पाहिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.