नवी दिल्ली – भारताने सन 2008 साली आलेल्या मंदीचा मुकाबला देशातील असंघटित क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला सुरक्षा पुरवून अत्यंत समर्थपणे केला होता. पण मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सहा वर्षात देशातील असंघटित क्षेत्राला उद्धवस्त करून लोकांना आपले गुलाम बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालवला आहे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
त्यांनी आज तीन मिनिटांचा एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की देशातील असंघटित क्षेत्रात शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, मध्यम स्वरूपाचे उद्योग ही सारी क्षेत्रे येतात. देशातील एकूण रोजगारीपैकी 90 टक्के रोजगार या क्षेत्रातून उपलब्ध होतो. आणि उर्वरित दहा टक्के संघटित क्षेत्रात मोठ्या कंपन्या, शेअर बाजार अशा साऱ्या संस्था येतात. त्यातून देशात केवळ दहा टक्के रोजगार निर्माण होतो. पण मोदींनी नियोजनबद्धपणे असंघटित क्षेत्र मोडीत काढून सारे लक्ष संघटित क्षेत्रावर केंद्रित केले आहे. गरीब आणि मध्यमवर्गी लोकांना आपले कायमचे गुलाम बनवण्याचा त्यांचा डाव आहे त्या विरोधात आपण एकजुटीने लढा दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि लॉकडाऊन या गोष्टी लोकांना उद्धवस्त करण्याच्याच हेतून केल्या गेल्या होत्या असे त्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनचा निर्णय अगदी आयत्यावेळी किंवा अचानक घेण्यात आलेला निर्णय नव्हता तर असंघटित क्षेत्र उद्धवस्त करण्यासाठी घेतलेला एक नियोजनबद्ध निर्णय होता असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदी केवळ मीडिया मॅनेजमेंट आणि मार्केंटिंगवरच आपले लक्ष केंद्रित करून आहेत असा आरोपही त्यांनी केला. केवळ 15 ते 20 माणसे मोदींचे हे काम करीत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.