मुंबई – आयपीएल स्पर्धेसाठी अमिरातीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने चेन्नईत 15 ते 20 ऑगस्ट या कालावधीत सराव शिबिर आयोजित केले होते. तेच संघाला घातक ठरल्याचे सांगितले जात आहे. या संघातील दोन खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील बारा व्यक्ती करोनाबाधित असल्याचे समोर आल्यावर बीसीसीआयने चेन्नई संघाला फटकारले आहे.
चेन्नई संघाने बीसीसीआयची विनंती धुडकावून हे शिबिर घेतले होते. त्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह सुरेश रैना, पियुष चावला, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर हे खेळाडू सहभागी झाले होते. चेन्नई वगळता अन्य एकाही संघाने असे शिबिर घेतले नव्हते. मात्र, बीसीसीआयने हे शिबिर आयोजित करू नका, असे सांगितलेले असतानाही चेन्नईने शिबिर घेतले.
आता त्यातीलच दीपक चहर व ऋतुराज गायकवाड यांना बाधा झाल्याचे सिद्ध झाल्याने या शिबिरात सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंबाबतही आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
स्पर्धेला धोका नाही – बीसीसीआय
चेन्नई संघातील करोनाबाधितांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा कालावधी संपल्यावर त्यांची पुन्हा करोना चाचणी होणार असून त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मात्र, याचा स्पर्धेच्या आयोजनावर कोणताही परिणाम होणार नसून स्पर्धा अत्यंत सुरक्षित वातावरणात पार पडेल, असे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले आहे.