अहमदनगर : ‘राज्य सरकारने मॉल उघडले, व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली, त्यामुळे मंदिरे बंद ठेवणे उचित नाही. आवश्यक उपाययोजना करणाऱ्या सर्वच मंदिरांना आता खुले करा, त्यामुळे परिसरातील रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल’ अशी मागणी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
आज गणेश चतुर्थी निमित्ताने राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कारखाना येथे सपत्निक श्री गणेशाची स्थापना केली. यावेळी बोलताना साई मंदिरासह इतरही मंदिरे खुले करण्याची मागणी विखे पिता-पुत्रांनी केली आहे.
शिर्डीचे साई मंदिर खुले करावे अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा, खासदार सुजय विखे यांनी दिला आहे.
“शिर्डीचं सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झाले. शिर्डी संस्थान आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयिस्कर असून, गर्दी न होता ठराविक संख्येने भाविकांना दर्शन देणे शक्य आहे. सर्व ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. मात्र सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा” इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.