केंद्रीय मंत्री मंडळाची मंजूरी
नवी दिल्ली – भारतीय विमानतळ प्राधिकरणाची जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम हे तीन विमानतळ सार्वजनिक-खाजगी भागीदारीद्वारे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्री मंडळाने आज मंजूरी दिली.
विमानतळ प्राधिकरणाने मागवलेल्या जागतिक पातळीवरील निविदांमधून अदानी एन्टरप्रायजेस लिमिटेडला या विमानतळांचे कामकाज, व्यवस्थापन आणि विकासासाठी हे तीन विमानतळ पन्नास वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या प्रकल्पांमुळे सार्वजनिक क्षेत्रात आवश्यक गुंतवणूकीसोबतच सेवा वितरण, कौशल्य, उपक्रम आणि व्यावसायिकतेमध्ये कार्यक्षमता येईल.
सुमारे 10 वर्षांपूर्वी सरकारने कामकाज, व्यवस्थापन आणि विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीवर दिल्ली आणि मुंबई येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाची विमानतळ भाड्याने दिली आहे. या सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या प्रयोगांमुळे जागतिक दर्जाचे विमानतळ उभारण्यास आणि विमानतळ प्रवाशांना उत्तम सेवा देण्यात मदत झाली आणि “एएआय’ला महसूल वाढविण्यात आणि देशातील उर्वरित विमानतळ आणि हवाई वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात मदत झाली आहे.
“पीपीपी’मुळे मिळालेल्या महसूलामुळे “एएआय’ने द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यास आणि त्यांच्या विमानतळाचा दर्जा सुधारून आंतरराष्ट्रीय श्रेणीनुसार त्यांना सुधारण्यास सक्षम केले आहे. म्हणूनच,”पीपीपी’ अंतर्गत आणखी विमानतळ भाड्याने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.