शिंदे वासुली(प्रतिनिधी) – जलवाहिनेचे सुरू असलेले काम पहिले बंद करा मगच चर्चा करू, असे म्हणत भामा आसखेडग्रस्तांनी भरपावसात बुधवार (दि. 19) पासून उपोषण व आंदोलन सुरू केले आहे. सायंकाळी पाचवाजेपर्यंत शासकीय अधिकारी आंदोलन स्थळी आले नाही तर 23 गावांत जलसमाधी आंदोलन सुरू करू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यानुसार अधिकारी न फिरकल्याने 23 गावांत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1302725200067182/
करोनाच्या पार्श्वभूमीवर भामा आसखेडग्रस्तांना आंदोलन व उपोषणाची परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलक जलवाहिनीच्या ठिकाणी उपोषण करण्याच्या तयारीत होते; परंतु चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी करंजविहीरे जवळच आंदोलकांना अडवले. त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केला. परंतु शेतकरी आंदोलनावर ठाम होते.
- 23 गावांतील शेतकरी मुलाबाळांसह उतरले पाण्यात
- करंजविहिरेजवळ नऊ जणांचे भरपावसात उपोषण सुरू
उपोषण करू दिले नाही किंवा अटक केली तर लगेचच 23 गावांमध्ये जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करू असा इशारा आंदोलकांनी दिल्याने काही अटींवर पोलीस प्रशासनाने जलवाहिनीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर निवडक लोकांना उपोषणाची परवानगी दिली. त्यानुसार पाऊस अंगावर घेत सत्यवान नवले, देवदास बांदल, गजानन कुडेकर, नवनाथ शिवेकर, अण्णा देवाडे, संतोष कावडे, किसन नवले, मंदार डांगले, कैलास साबळे, नामदेव देशमुख उपोषणास बसले आहेत. बाकी सर्व प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी माघारी पाठवले आहे.
करोनामुळे आम्हाला आंदोलनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. परंतु जलवाहिनीच्या कामावरील कामगारांना व बंदोबस्तासाठी व बचाव कार्यासाठीचे पोलीसांना सोशल डिस्टसिंगचा नियम नाही का? प्रशासन आमच सगळ्याच बाजूने मुस्कटदाबी करत आहे. परंतु आम्ही आंदोलनावर ठाम असून जलवाहिनेचे काम बंद करा व मगच उपोषण मागे घेतले जाईल. आता प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही.
– सत्यवान नवले, आंदोलक
पोलीस प्रशासनाने धरणपरिसर, करंजविहीरे, धामणेफाटा व जलवाहिनीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच जिल्हाप्रशासनाने आसखेड खुर्द हद्दीतील जलवाहिनीचा एक किलोमीटर परिसर कलम 144 अन्वये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
प्रकल्पबाधित 23 गावांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. आंबोली, अखतुली, वेल्हावळे, साबळेवाडी, पराळे, वाघू टेकवडी, चोरघेवाडी, गवारवाडी, वहागाव, कोळीये या गावातील प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध व तरुण शेतकरी बायका मुलांसह नदीपात्रात उतरुन जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, खबरदारी व गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका व एनडीआरएफच्या सहा बोटींची व्यवस्था केली असून आंदोलक पाण्यात उतरताच त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक गावांत पथकांची धावपळ उडाली आहे.
खासदार, आमदार कोठे गेला तुमचा कळवळा..?
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते हे लोकप्रतिनिधी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. तरीही या तिघांनाही भामा आसखेडग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांनी आंदोलकांना वाऱ्यावर सोडले आहे. आमदार-खासदार तर धुमकेतुपणे उगवतात आणि आम्हाला आंदोलकांचा किती कळवळा आहे हे दाखवून देतात. आता कोठे गेला तुमचा कळवळा? हे केवळ मतांसाठीच आंदोलकांचा वापर करतात, असा घणाघाती आरोप आंदोलकांनी केला आहे.