नवी दिल्ली –देशात करोना संकट कायम असताना विविध निवडणुका कशा पार पडणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. त्यापार्श्वभूमीवर, करोनाकाळात निवडणुका घेण्यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे सूतोवाच निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
बिहार विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. त्यामुळे त्या राज्यात वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय, विविध राज्यांमधील रखडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकाही घेणे अगत्याचे आहे. मात्र, इतक्यात करोना संकट संपण्याची चिन्हे नाहीत. तसे असले तरी निवडणूक आयोगाला निवडणुकांबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यातून आयोगाने राजकीय पक्षांची मते मागवली.
त्याशिवाय, राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सूचनाही मागवल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाची मंगळवारी येथे बैठक झाली. त्या बैठकीत तीन दिवसांत मार्गदर्शक सूचना निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. करोना संकटामुळे व्हर्च्युअल प्रचार मोहिमेला प्राधान्य दिले जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.