-ऑगस्ट महिन्यात भावात सुमारे 10 टक्क्यांनी वाढ
-मध्य प्रदेश येथील पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा परिणाम
पुणे – मध्य प्रदेश येथे पिकावर पडलेल्या विषाणूजन्य रोगाचा फटका लाल मिरची पिकाला बसला आहे. तेथील मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मिरचीची झाडे काढून टाकली आहेत. त्यामुळे लाल मिरची अधिक तिखट बनली आहे. ऑगस्ट महिन्यात मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मिरचीच्या भावात सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापारी आणि दि पुना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुगळे यांनी दिली.
मूळातच करोनाचा फटका मिरची व्यापाराला बसला आहे. अपेक्षित व्यापार होत नाही. परदेशात निर्यात नेहमीच्या तुलनेत कमी झालेली आहे. या वातावरणामध्ये तिखट, पावडर बनविणे अवघड आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातही मिरचीला मागणी कमीच आहे. पाऊस उघडल्यानंतर गिऱ्हाईक वाढण्याची शक्यता असल्याचे सांगून गुगळे म्हणाले, मागील तीन ते चार वर्षांपासून मध्य प्रदेश येथील मिरची पिकाची काहीना काही कारणाने नुकसान होत आहे.
दसऱ्याच्या आसपास मध्य प्रदेश येथील मिरचीची आवक सुरू होत असते. मात्र, यावर्षी विषाणूजन्य रोगामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात लाल मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, भावात वाढ झाली आहे. आता मिरचीच्या भावात डिसेंबर ते जानेवारीमध्ये आंध्र प्रदेश येथून आवक सुरू होईपर्यंत घट होण्याची शक्यता कमी आहे. राज्यातील जालना, औरंगाबाद भागातील मिरचीचे पिक मात्र चांगले आहे.