सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय लांबणीवर
मुंबई – बीसीसीआयमधील पद धोक्यात आलेल्या अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. येत्या 17 तारखेला याबाबत होणारा निर्णय आता लांबणीवर टाकण्यात आला आहे.
यंदा मार्च महिन्यापासून देशात करोनाचा धोका वाढल्याने बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा आता अमिरातीत घेण्याचे निश्चित केले. मात्र, बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार कूलिंग ऑफ कालावधीचा फटका गांगुली व शहा यांना बसणार होता. या दोघांची मुदत याच महिन्यात संपुष्टात आली होती. अर्थात, त्यापूर्वीच काही सदस्यांनी यांची नियुक्ती कायम राहावी यासाठी घटनाबदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी निर्णय होणार होता. मात्र, आता हा निर्णय व याचिकेवरील सुनावणी लांबणीवर टाकण्यात आल्याने या दोघांनाही दिलासा मिळाला आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होइपर्यंत गांगुली व जय शहा यांना पदावर कायम राहता येणार आहे. 22 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सर न्यायाधीश जस्टीस शरद बोबडे, एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने 17 ऑगस्ट रोजी बीसीसीआयच्या याचिकेवर अंतिम निर्णय दिला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयची याचिका अंतिम निर्णय जाहीर करण्यासाठी आत्ता विचारातच घेतली नसल्याने तसेच सार्वजनिक सुट्ट्या पाहता याचिकेवर निर्णय दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.