संदीप राक्षे
सातारा -खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आवाहनानुसार सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेत घरपट्टी माफ करण्याबाबतचा ठराव आहे. तो मंजूर होण्याची प्रतीक्षा आहे. सभेमध्ये तो मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वीच पालिकेच्या नियमांप्रमाणे वसुली प्रक्रिया सुरू करून पालिकेने महसूल संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.
राज्य शासनाने घरपट्टी माफ केल्यास पुढील वर्षी माफी दिली जाऊ शकेल, असा सूर पालिका वर्तुळातून व्यक्त होत आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी घरपट्टी माफीची राज्य सरकारकडे केलेल्या मागणीचा ठराव सातारा पालिकेकडून मंजूर व्हायचा आहे.
करोनामुळे आर्थिकदृष्टया गांजलेल्या सातारकरांना दिलासा देण्यासाठी उदयनराजे यांनी जिल्ह्यातील तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना घरपट्टी व पाणीपट्टी माफी राज्य शासनाने द्यावी, अशी मागणी करून 319 स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले होते. येत्या सर्वसाधारण सभेत सातारा पालिकेने घरपट्टी पाणीपट्टी माफीचा विषय अजेंड्यावर घेतला आहे.
एकीकडे सातारा विकास आघाडीचा हा धोरणात्मक निर्णय झाला असला तरी दुसरीकडे घरपट्टी वसुलीच्या कलम 150 (क) च्या नियमाने पालिकेने वसुलीची प्रक्रिया सुरू करून त्यातून महसूल संकलित करणे सुरू केले आहे. याबाबत वसुली प्रमुख म्हणाले, “राजकीय मागण्या व प्रशासकीय कामे
यांच्यामध्ये नियमांचे अंतर असते.
घरपट्टी माफीचा विषय मांडला जाणे हा सातारा विकास आघाडीच्या राजकीय धोरणाचा भाग आहे. मात्र, घरपट्टीची बिले वाटप करणे हा पालिकेच्या रूटीन कामाचा भाग आहे. दोन्ही घटनांचा संदर्भ लावून त्याची राजकीय गल्लत केली जाऊ नये.’
राज्य शासनाने घरपट्टी माफी दिल्यास यंदा घरपट्टी भरलेल्या नागरिकांना पुढील वर्षी घरपट्टी माफी दिली जाऊ शकेल, अशी माहिती वसुली विभागातून मिळाली. उदयनराजे यांच्या आघाडीच्या नगरसेवकांनीही घरपट्टी माफीच्या मुद्यावरही प्रशासनाची री ओढली आहे. उदयनराजेंची जनहिताची भूमिका आहे. त्यांची सूचना पालिकेच्या नियमात बांधली आहे.
घरपट्टीत सवलत देणाऱ्या अपिलिय समितीचीही अद्याप रचना नसल्याने करोनाच्या भीतीने हतबल सातारकरांना घरपट्टीची चाट बसणार आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण तीव्रतेने जाणवणाऱ्या सर्वसामान्य सातारकराची जगण्याची लढाई सुरू आहे. त्यामध्ये आर्थिक विवंचना हा महत्वाचा मुद्धा असताना घरपट्टीची अडीच हजारांपासून पुढची बिले भरताना सातारकरांची दमछाक होणार आहे.
छोटे विक्रेते, व्यापारी, कारागिर, व्यावसायिक यांना कर्जाच्या हप्त्यांनी बेजार केले आहे. त्यासाठीच घरपट्टी माफी करावी त्यासाठी सुरू असलेल्या उदयनराजेंच्या प्रयत्नांना साताऱ्यातच नाही तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रतिसाद द्यायला हवा.
घरपट्टी माफी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या विषयाला मंजुरी देऊन तो प्रस्ताव शासनाला पाठवला जाणार आहे. घरपट्टीची बिले काढली जाणे हा प्रशासकीय कामांचा भाग आहे. शासनाने यंदा माफी दिल्यास पुढील वर्षी घरपट्टी आकारणीत पालिकेकडून सवलत दिली जाईल.
माधवी कदम,
नगराध्यक्ष, सातारा.
घरपट्टी माफीचा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला आहे. करोनाच्या संकटात सातारकरांना आर्थिक दिलासा देण्याचा हा एक प्रयत्न आहे. घरपट्टी माफीसंदर्भात उदयनराजे भोसले यांच्या सूचनेप्रमाणे पाठपुरावा केला जाईल.
किशोर शिंदे
उपनगराध्यक्ष, सातारा.
उदयनराजेंनी राज्य शासनाकडे घरपट्टी माफीची मागणी केली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना तसे प्रस्ताव देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वीज वितरणने शंभर युनिटपर्यंत वीज माफी देण्याची घोषणा केली. मुंबई महापालिकेने तीनशे स्क्वेअर फुटांच्या घरांना घरपट्टी माफी दिली. त्याचप्रमाणे राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घरपट्टी माफ करून ती रक्कम त्यांना अनुदानाच्या स्वरूपात द्यावी. खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी व्यापक विचाराची आहे .
ऍड. दत्ता बनकर, स्वीकृत नगरसेवक.