ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आहे. कोविड रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आधी दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी त्यांना 31 जुलै रोजी अटक केली होती.
ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला होता, मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सात दिवसानंतर जाधव यांना जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले. अविनाश जाधव यांना सोमवारी पोलीस स्थानकात हजेरी द्यावी लागणार आहे.
दरम्यान, मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले “न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोविडसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती. पुढेदेखील अशीच लढाई जनेतेसाठी सुरू राहील”