स्पीड पोस्टनेही पोहोचल्या नाहीत राख्या : अनेक बहीण-भावांचा हिरमोड
पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे वाहतुकीवर आलेल्या निर्बंधांमुळे यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी एकमेकांपासून दूर अंतरावर राहणाऱ्या बहीणभावाची गाठभेट होणे कठीण बनले होते. त्यामुळे भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी महिलांनी पोस्टसेवेचा आधार घेतला. दरवर्षीपेक्षा यंदा पोस्टाद्वारे राख्या पाठवण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले होते. सध्याची परिस्थिती पाहता किमान यावर्षी तरी टपाल विभाग आपले काम चोख बजावेल, अशी अपेक्षा होती. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही टपाल विभागाने अनेक भावांचे हात सुनेच ठेवले. स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठविलेल्या बहिणींनी पाठविलेल्या राख्या देखील टपाल विभागाने अनेक भावापर्यंत पोहचविल्या नाहीत.
एकमेकांपासून दूर राहणारे बहीणभाऊ रक्षाबंधनाच्यादिवशी आवर्जून एकमेकांना भेटतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी असतानाही यंदा मात्र हे चित्र दिसणार नव्हते. दूरगावी व इतर राज्यात राहत असलेल्या बहीण-भावांपर्यत पोहचणे शक्यच नव्हते. त्यामुळे यंदाच्या सणाला राख्या पाठविण्यासाठी बहिणींनी पोस्ट सेवेचा आधार घेतला होता. भावाला राख्या पाठवण्यासाठी बहिणींनी आठवडा भरापूर्वीपासूनच पोस्ट कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील पोस्ट कार्यालयांमधून यंदा राख्या पाठवण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले.
यंदा बहुतेक बहीण-भावांची भिस्त आपल्यावरच असल्याचे माहीत असताना देखील टपाल विभागाने आपली कार्यप्रणाली बदलली नाही. तब्बल दहा दिवसांपूर्वी केलेले स्पीड पोस्ट देखील भावांपर्यंत पोहचू शकले नाही. बहीण वारंवार भावाला फोन करुन राखी मिळाली का? विचारत होती आणि अजून नाही हे उत्तर ऐकून नाराज होत होती.
स्थानिक कुरियर कंपन्या वरचढ
करोनाच्या काळात अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय ऑनलाइन सुरु केले. लहानातील लहान व्यावसायिक देखील बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचा आधार घेत होम डिलिव्हरीची सुविधा देऊ लागले. या व्यावसायिकांकडून वस्तू लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम स्थानिक कुरियर कंपन्या चोख बजावताना दिसतात. परंतु अनेक वर्षांचा वारसा असलेला आणि प्रचंड मोठा व्याप असलेल्या टपाल विभागाकडून मात्र पैसे घेऊनही वेळेत राखी पोहचविता येत नाही.