नवी दिल्ली : देशातील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. य निमंत्रणामध्ये खास निमंत्रण ठरले आहे ते म्हणजे २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
“मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आले आहे. ते अयोध्येचे निवासी आहेत आणि आम्ही त्यांना आमंत्रित केले आहे”, असे राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.
We have also invited Iqbal Ansari (former litigant in Ayodhya land dispute case) and Padma Shri, Mohammed Sharif to the foundation stone laying ceremony: Champat Rai, general secretary of Sri Ramjanmbhoomi Teerth Kshetra trust. #RamTemple pic.twitter.com/wnSzP6DuI0
— ANI UP (@ANINewsUP) August 3, 2020
गेल्या २७ वर्षांपासून मोहम्मद शरीफ हिंदू-मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म न बघता बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास २५ हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शरीफ यांचा एक मुलगा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होता. तो सुल्तानपूरमध्ये गेला असताना त्याची हत्या करुन मृतदेह फेकून देण्यात आला. नातेवाईकांनी त्याचा बराच शोध घेतला, पण मृतदेह सापडला नाही. तेव्हापासून शरीफ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. स्थानिक लोकांमध्ये ते ‘शरीफ चाचा’ नावाने ओळखले जातात. ‘जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत राहणार, कारण या सेवेमुळे मला आनंद मिळतो’, असे शरीफ चाचा म्हणतात.
दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनासाठी करोनाच्या उद्रेकामुळे कमीत कमी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून १७५ जण सोहळ्यात सहभागी होतील. त्यापैकी १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.