नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या काळातही मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. १३ हजार २४८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. विशेष म्हणजे चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महसुलात ४२ टक्क्यांची घट होऊनही कंपनीने नफा कमावला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १ लाख ९२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तो गतवर्षीच्या याच कालावधीतील ४२ टक्क्यांनी कमी आहे. तर बीपी सौद्यातून मिळालेले ४,६९९ कोटी रुपयांचे एकरकमी उत्पन्न, जिओची चांगली कमाई आणि खर्चात कपात केल्याने तिमाही निकाल चांगला आहे.
रिलायन्स जिओला एप्रिल-जून तिमाहीत २,५२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तो मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत १८२.८ टक्क्यांनी जास्त आहे. यासोबतच तिमाहीत जिओचे ९९ लाख ग्राहक वाढले तसेच एकूण ग्राहक ३९ कोटी ८३ लाखांवर गेले. कंपनीचे प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न (एआरपीयू) सुमारे १० रुपयांनी वाढून दरमहा १४०.३ रुपये झाले आहे.
दरम्यान, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मालमत्ता 75.30 अब्ज डॉलर झाली आहे. आता ते जगात पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.